मुंबईत विमानांचे ट्रॅफिक जॅम; पाकिस्तानने हवाई हद्दीवर बंदी घातल्याचा परिणाम

पाकिस्तानची हवाई हद्द बंद झाल्यामुळे हिंदुस्थानने आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणाचे मार्ग बदलले आहेत. त्यामुळे मुंबईतील हवाई वाहतुकीमध्ये मोठी वाढ झाल्याचे मुंबई हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने (एटीसी) म्हटले आहे. अनेक परदेशी विमान कंपन्या पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर टाळत असल्यामुळेही मुंबईत हवाई वाहतूक वाढली आहे.

पाकिस्तानने केलेल्या पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानातील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानने हिंदुस्थानी विमान कंपन्यांसाठी आपली हवाई हद्द बंद केली आहे. याला प्रत्युत्तर म्हणून हिंदुस्थाननेही पाकिस्तानसाठी आपली हवाई हद्द बंद केली. पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे, मुंबईहून युरोप, उत्तर आणि दक्षिण अमेरिकेला जाणा-या विमानांबरोबरच मुंबई एटीसीला उत्तर भारताकडे जाणा-या देशांतर्गत विमानांचीही हाताळणी करावी लागत आहे.

मुंबई एटीसीवरचा भार वाढला
साधारणपणे, मुंबई एटीसी दररोज 950 ते 970 उड्डाणांचे नियमन करते आणि हवाई वाहतूक योग्यरित्या हाताळते. मात्र, पाकिस्तानने हवाई हद्द बंद केल्यामुळे होणा-या हवाईकाsंडीमुळे यात सुमारे 2 हजारांपेक्षा जास्त उड्डाणांची भर पडली आहे. उत्तर भारतातून अहमदाबाद मार्गे मस्कतला जाणारी सुमारे 130 उड्डाणे मुंबईच्या हवाई हद्दीतून जात आहेत तर आग्नेय आशियातून आखाती देश, युरोप आणि अमेरिकेला जाणारी 250 उड्डाणेदेखील मुंबई मार्गे जात आहेत.