
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर विदेशात गेलेली सर्वपक्षीय शिष्टमंडळे परतीच्या वाटेवर आहेत. भाजपचे बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ मंगळवारी मायदेशी परतले, तर उर्वरित सहा शिष्टमंडळे 8 जूनपर्यंत येण्याची शक्यता आहे. ही शिष्टमंडळे पुढील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. जागतिक पातळीवर पाकिस्तानच्या दहशतवादाचा बुरखा फाडण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळे विविध देशांत गेली आहेत.
विदेशातून परतल्यानंतर सातही शिष्टमंडळांचे नेते संयुक्त पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार आहेत. मंगळवारी परतलेल्या शिष्टमंडळात एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी, गुलाम नबी आझाद, माजी परराष्ट्र सचिव हर्ष शृंगला, निशिकांत दुबे, फंगनन कोन्याक, रेखा शर्मा, सतनाम सिंग संधू यांचा समावेश होता. त्यांनी सौदी अरेबिया, कुवेत, बहरीन व अल्जेरिया या देशांना भेट दिली. इतर 6 शिष्टमंडळे 8 जूनपर्यंत परत येणार आहेत. सर्व शिष्टमंडळांचे सदस्य 9 किंवा 10 जूनला मोदींची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. या भेटीत शशी थरूर व सुप्रिया सुळे आदी नेते त्यांच्या दौऱ्याचा अहवाल सादर करणार आहेत.
दहशतवादाविरुद्ध युद्ध
हिंदुस्थान-पाकिस्तान वादाला दहशतवादाविरुद्ध युद्ध म्हणून पाहण्याचे आवाहन सर्वपक्षीय शिष्टमंडळातील नेत्यांकडून विविध देशांना केले जात आहे. हिंदुस्थानने पाकिस्तानबद्दलचा दृष्टिकोन बदलला आहे. सीमेपलीकडून येणाऱ्या दहशतवादी धोक्याविरुद्ध हिंदुस्थान सक्रिय भूमिका घेईल, असे शिष्टमंडळाने म्हटले आहे.
हिंदुस्थानची राष्ट्रीय भाषा विविधतेतील एकता! कनीमोळींच्या उत्तरावर टाळ्यांचा कडकडाट
स्पेनमध्ये गेलेल्या शिष्टमंडळाला तेथील पत्रकारांनी, हिंदुस्थानची राष्ट्रीय भाषा कोणती? आणि त्यांची भूमिका काय? असे प्रश्न केले. त्यावर डीएमके पक्षाच्या नेत्या, खासदार कनीमोळी करुणानिधी यांनी अत्यंत हुशारीने उत्तर दिले. हिंदुस्थानची राष्ट्रीय भाषा विविधतेतील एकता हीच आहे, असे कनीमोळी म्हणाल्या. त्यांच्या उत्तरावर टाळ्यांचा कडकडाट झाला. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी ट्विट केले. ‘हिंदुस्थान हा असंख्य भाषा, प्रांत, रचना, चालिरीती, विविध धर्मांचा असला तरीही आमची ताकद आमची एकता असण्यात आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर हेच अधोरेखित झाले,’ असे आव्हाड यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले.