
>> अजित कवटकर, [email protected]
आपल्या माता-भगिनींच्या कपाळावरचे सिंदूर ज्यांनी मिटवले त्यांना मिटविण्यासाठी भारतीय सैनिकांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत ज्या पराक्रमाने दहशतवाद्यांवर आणि त्यांना आश्रय, प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानला योग्य ती समज दिली, ते कौतुकास्पद, अनुकरणीय होते. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पराक्रमाचे संपूर्ण श्रेय हे सैन्यदलाचेच होते आणि आहे. शस्त्रसंधी पश्चात सत्तापक्षाने या विषयावरून श्रेयवादाचे राजकारण करू नये. युद्ध हा विषय श्रेय घेण्याचा नव्हे. सत्तापक्षाने युद्धावरून श्रेयवादाचे राजकारण करणे टाळून एक अनुकरणीय आदर्श निर्माण करावा.
पहलगामच्या हल्ल्याचा बदला घेतलाच गेला पाहिजे. ज्यांनी आपल्या लोकांना मारले त्यांना यमसदनी पाठविण्यासाठी आक्रमक आणि निर्णायक कारवाई केलीच गेली पाहिजे, अशी संपूर्ण हिंदुस्थानाची मागणी होती. त्यामुळे केंद्र सरकारला जनमताचा आदर राखणे आणि त्याप्रमाणे कृती करणे अपरिहार्य होते. सरकार त्या दृष्टीने जो काही निर्णय घेणार होते त्याला संपूर्ण देशाचा पाठिंबा मिळणार होता आणि त्याप्रमाणे तो मिळालादेखील. पक्षभेद, वैचारिक मतभेद, वोटबँक पॉलिटिक्स वगैरे सर्व काही बाजूला सारून सर्व राजकीय पक्षांनी सरकारला पाठिंबा दिला. ही एका राष्ट्राची दुसऱ्या राष्ट्राशी होणारी लढाई होती. हे भारत-पाकिस्तान युद्ध होते. इथे दोन्ही देशांचे सैन्य एकमेकाला भिडले, एकमेकांवर चढाई केली. युद्धभूमी झालेल्या सीमाभागलगतच्या क्षेत्रातील अनेक नागरिकांनादेखील याची प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे झळ पोहोचली. शेवटी, धर्माचा, सत्याचा आणि शौर्याचा विजय झाला. पाकिस्तान अवघ्या चार दिवसांतच काकुळतीला आला.
दहशतवाद्यांवर, दहशतवादावर जरब बसवून भारताने आपल्या सैन्य सामर्थ्यावर व पराक्रमाने त्यांना हे दाखवून दिले की यापुढे त्यांचा कोणताही अतिरेक चालवून घेतला जाणार नाही आणि तरीही त्यांनी काही चुकीचे करण्याचे धाडस केलेच तर त्याचे परिणाम अतिशय गंभीर असतील. दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्याचा, त्यांचा ‘टेरर इन्फ्रास्ट्रक्चर’ निरुपयोगी करण्याचा प्राथमिक उद्देश आपल्या सैन्याने साध्य केला. सरकार म्हणून देशाच्या नेतृत्वाने या संपूर्ण परिस्थितीत घेतलेल्या निर्णयांचा, भूमिकेचा संपूर्ण देशाने आदर केला, समर्थन दिले, स्तुती केली. या संपूर्ण परिस्थितीत संपूर्ण देश सरकारच्या पाठीशी ठामपणे उभा होता. आपण देश म्हणून लढलो. देशातील भिन्न भिन्न मतप्रवाहांना एकवटण्याची ताकद राष्ट्रवादात असते, याची प्रचिती या युद्धासमयी आली. त्यामुळे ही एकजूट, हा चांगुलपणा टिकवून राहण्यासाठी युद्धविराम वा शस्त्रसंधी पश्चात सत्तापक्षाने या विषयावरून श्रेयवादाचे राजकारण करू नये, कारण युद्ध हा विषय श्रेय घेण्याचा नव्हे.
आपण सरकार निवडून देतो ते देशाच्या सर्वांगीण विकासासाठी, देशवासीयांच्या प्रगतीसाठी – सुरक्षेसाठी – आरोग्यासाठी. हे करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांची सफलता वा असफलता ही सरकारच्याच पदरात पडते. आपल्या अर्थव्यवस्थेचा विकास दर, सकल राष्ट्रीय उत्पादन, रोजगार, राहणीमानाचा स्तर, महागाई, साक्षरता, कायदा – सुव्यवस्था, मानवी हक्क, वगैरेंची आकडेवारी हे सरकारचे यशापयश ठरवते. यातील यशाचा डंका सरकार अभिमानाने मिरवू शकते आणि अपयशाचे खापरदेखील स्वतःच्याच डोक्यावर पह्डून घेणे क्रमप्राप्त ठरते. सत्तापक्ष व विरोधक यांच्यातील यशापयशाच्या निकषांमधील भिन्नतेमुळे या विषयांत मतमतांतर असते आणि म्हणूनच इथे राजकारणाला मोठा वाव मिळतो. पण ‘युद्ध’ हे या गणतीत येत नाही. युद्ध ही एक राष्ट्रीय आपत्ती असते, ज्याचा नकारात्मक परिणाम हा देशातील प्रत्येक स्तरावर, प्रत्येक घटकावर होत असतो. आपल्या राष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, हक्कासाठी, न्यायासाठी प्रत्येक देशवासी हा होणाऱ्या वा होऊ घातलेल्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी तयार असतो व देश, सरकार, सैन्य या सर्वांच्या मागे ठामपणे उभा असतो. त्यामुळे युद्धातील जय – पराजय हा देशाचा होतो, कुणा एका सत्तेचा वा पक्षाचा नव्हे. हे असे असेल तेव्हा युद्ध परिस्थितीत राष्ट्र हे सर्व आव्हानांसमोर एकसंध उभे राहते आणि हे कायम असेच राहावे यासाठी सत्तापक्षाने काही तारतम्य, मर्यादा बाळगणे अत्यावश्यक ठरते. काही विषय हे असे असतात जिथे किती जरी राजकीय लाभ उठविण्याची संधी असली तरी तिथे राजकारण न करणे प्रगल्भतेचे असते, राष्ट्रहिताचे ठरते आणि यातील युद्ध हा विषय तर सर्वात विशेष. आपल्या सैन्याचा, संरक्षक दलांचा उदो उदो हा जाणीवपूर्वक केला गेलाच पाहिजे, पराक्रम केलेल्या सैनिकांचा सन्मान – सत्कार हा झालाच पाहिजे, पण हे सारं बाजूला सारून जर कोणी आपलाच पक्ष लढाई लढला आणि जिंकला या आविर्भावात प्रचार करू लागला तर ते चुकीचे ठरेल. सरकारने जरी तसे केले नाही तरी, सत्तापक्षाचे उत्साही कार्यकर्ते जर याविषयावरून बॅनरबाजी करत विरोधी पक्षांना त्यावर प्रतिक्रिया देण्यास मजबूर करून ऐक्य बिघडविण्याचे काम करत असतील तर नेतृत्वाने त्यांना रोखणे, समज देणे आवश्यक आहे.
एखादा सत्तापक्ष जर का अशा प्रकारचे नीतिनियम न पाळता युद्ध यास एक राजकीय हत्यार म्हणून स्वतःच्या स्वार्थासाठी वापरू लागला तर ते देशहिताचे नक्कीच नसेल. सरकारच्या या श्रेय घेण्याच्या वृत्तीला वा विरोधकांहून आम्ही कसे श्रेष्ठ आहोत हे दाखवून देण्याच्या सवयीला लगाम घालण्याच्या प्रयत्नात मग विरोधकांकडून, अशा परिस्थितीत सरकारने घेतलेल्या निर्णयांमधील त्रुटी, चुका, पह्लपणा हा आपसूकच बोलून दाखवला जातो. अशामुळे समाज दोन परस्परविरोधी विचारप्रवाहांमध्ये विभागला जाण्याचा धोका असतो आणि तेही अशा वेळी जेव्हा आपण एकजूट राखणे अतिशय आवश्यक असते. आंतरराष्ट्रीय राजकारण आणि विशेषकरून परराष्ट्र मुत्सद्देगिरीच्या दृष्टिकोनातून हे मारक ठरते. आजच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर तर मग यावरून एक वेगळीच ‘तू तू मै मै’ सुरू होते, ज्यात सर्वजण विनाकारण उडी घेऊन अधिक गोंधळ घालत असतात. या सगळ्याचा मग एक तमाशा होतो, जो जगासमोर एक वेगळं चित्रं उभं करतो. हे देशासाठी लाजिरवाणं ठरतं. त्याहून अधिक, स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्यासाठी प्राणपणाने लढणाऱ्या त्या शूर सैनिकाचे मनोबल यामुळे कमजोर होऊ शकते. शिवाय देशात लपून बसलेल्या शत्रूला, देशद्रोही – देशविघातक शक्तींना अशा परिस्थितीचा फायदा उचलून देशात अराजकता निर्माण करण्याची संधी मिळते. हा अंतर्गत कलह अधिक नुकसानकारक ठरत असतो.
आज एक असा विषय राहिलेला नाही, ज्यात राजकारण होत नाही आणि ज्यातून स्वतःचा वा स्वतःच्या पक्षाचा स्वार्थ साधला जात नाही. स्वतःकडे श्रेय खेचून घेण्याएवढीच तडफ आज विरोधकांना किंचितही श्रेय मिळू नये यासाठी होताना दिसते आणि त्यातून होणाऱ्या रस्सीखेचीत सगळं समाजकारण दूषित होत असतं. हे असं इतर सर्व बाबतीत चालवून घेतले जात असले तरी ते ‘युद्ध’ या विषयाबाबत चालता कामा नये, याची जबाबदारी प्रत्येकाची आहे, सत्ताधाऱ्यांची तर विशेष. करदात्याच्या पैशांतूनच देश चालविणारी संपूर्ण प्रणाली, प्रक्रिया, व्यवस्था उभी राहते, ज्यातून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना पगार व भत्तेदेखील मिळतात. त्यामुळे केलेल्या इतर कामांचे श्रेय लुटत फिरणं हे जरी राजकारण म्हणून दुर्लक्षित करता आले तरी युद्ध परिणामांवरून देखील त्यांनी तेच करणे अतिशय अयोग्य आहे. राजकारणाला जेव्हा मर्यादा राहात नाही तेव्हा ते धोकादायक बनतं. पक्ष नव्हे तर राष्ट्र सर्वश्रेष्ठ असतं आणि राष्ट्राची ताकद ही त्याच्या एकजुटीत असते. निदान युद्धासमयी तरी ती ताकद नैसर्गिकपणे दिसून यावी, कायम राहावी यासाठी सत्तापक्षाने युद्धावरून श्रेयवादाचे राजकारण करणे टाळून एक अनुकरणीय आदर्श निर्माण करावा.