
>> डॉ. रामकिशन दहिफळे
उदार धर्मकारण, कल्याणकारी राजकारण व समाजकारण करणाऱ्या अहिल्यादेवी होळकरांनी आपल्या महेश्वरच्या वाडय़ावर जी प्रतिज्ञा लिहिली आहे ती त्यांच्या विचारांची आणि जीवन विचारांची बैठक स्पष्ट करणारी आहे. ती आजच्या सत्ताधाऱ्यांना जागे करणारी आहे. राजकारण आणि धर्मकारण या दोन्ही गोष्टींचे लोककल्याण हेच केंद्र त्यांनी ठेवले. मराठा कालखंडात राजमाता जिजाऊ, येसूबाई, ताराबाई अशा कर्तबगार स्त्रियांची मालिका दिसून येते. त्यात अहिल्यादेवी होळकरांचे नाव लोककल्याणकारी व कर्तबगार म्हणून नोंदवले गेले.
लोककल्याणासाठी निर्माण केलेले राज्य विश्वस्तांच्या भूमिकेतून कसे जपले जाईल याचा आदर्श ज्या ज्या राज्यकर्त्यांनी घालून दिला त्या राज्यकर्त्यांच्या यादीत होळकर घराण्याचा उल्लेख अतिशय आदराने आणि आपुलकीने केला जातो. स्वतःच्या राज्यात व राज्याबाहेर लोककल्याणाची कामे करून दिगंत कीर्ती मिळविणारे राज्यकर्ते होळकरांशिवाय दुसरे कोणीही नव्हते. या घराण्याविषयी आणि विशेषतः मल्हारराव होळकर व अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी जनसामान्यांच्या मनात आजही प्रचंड आदर आहे.
अहिल्यादेवी होळकरांवर संकटे आणि दुःखाचे प्रचंड डोंगर कोसळले तरी न डगमगता 28 वर्षे त्यांनी माळवा प्रांताचा कारभार मोठय़ा कुशलतेने केला. राज्यकारभार करणाऱ्या त्यांच्या समकालीनांना व नंतरच्या राजांना त्यांचे जीवन मार्गदर्शक व स्फूर्तिदायक ठरेल असेच आहे. अठराव्या शतकात अहिल्यादेवी होळकरांसारखी पराक्रमी, निःस्वार्थी, धर्मपरायण, लोककल्याणकारी कार्य करणारी तेजस्वी व्यक्ती विशेषतः भारताच्या इतिहासात कोठे झाली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या संकल्पनेला भारतभर विस्तारित करण्याचे महान कार्य अहिल्यादेवी होळकरांनी केले आहे. याची दखल घेऊन ब्रिटिश पार्लमेंटने त्यांना ‘अठराव्या शतकातील सर्वात महान महिला शासक’ म्हणून गौरविले आहे तर युरोपियन कवयित्री जोना बेले हिने अहिल्यादेवींवर खंडकाव्य लिहिले आहे. 19 व्या शतकातील युरोपातील स्त्रीमुक्तीच्या चळवळीची प्रेरणा म्हणूनही अहिल्यादेवी होळकरांचा उल्लेख अनेकांनी केला आहे.
होळकरशाहीची प्रस्थापना करून मराठेशाहीचा उत्तर हिंदुस्थानात दबदबा निर्माण करणाऱ्या मल्हारराव होळकर यांनी अहिल्यादेवींमधील कारभारक्षमता ओळखली होती. त्यांनी अहिल्यादेवींना कमी लेखले नाही. मुलगा खंडेराव होळकर यांच्या मृत्यूनंतर त्यांनी राज्यकारभार अहिल्यादेवींकडे सोपवला. तो काळ हा फुटीरतेने ग्रासलेला आणि लहान-मोठय़ा लढायांमध्येच राज्यकर्त्यांची आर्थिक, मानसिक शक्ती खर्च करणारा काळ होता. या पार्श्वभूमीवरच अहिल्यादेवींचे धर्माधिष्ठत राजकारण हे थोडे वेगळे ठरते. राजकारण आणि धर्मकारण या दोन्ही गोष्टींचे लोककल्याण हेच केंद्र त्यांनी ठेवले. धर्मकारण करताना प्रजा या शब्दाचा अर्थ केवळ होळकर संस्थानातील प्रजा एवढय़ापुरताच मर्यादित नव्हता. त्यांनी ‘साऱ्या देशभरातील लोकसमूह’असा त्या शब्दाचा अर्थविस्तार केला आणि धर्माच्या अनुषंगाने साऱ्या देशात अनेक लोकोपयोगी कामे उभी केली. ज्या प्रदेशात मुस्लिम राजवट होती तिथेही हिंदू मंदिरांची बांधकामे केली. मंदिरे, दर्गा, घाट, पूल, रस्ते, वाडेतलाव, बारवा, धर्मशाळा, अन्नछत्रे बांधली. भारताबरोबरच भारताच्या बाहेर नेपाळमध्ये पशुपतीनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. पाकिस्तानातील कराचीजवळ त्यांनी बांधलेले शिवमंदिर आजही उभे आहे.
अहिल्यादेवी होळकर यांनी राज्यकारभार करत असताना करवसुलीसाठी राज्याचा व खासगीचा असे दोन भाग केले होते. त्यांनी कटाक्षाने आपल्या खासगी मिळकतीतून कौटुंबिक जबाबदाऱ्या निभावल्या. जो भाग दौलतीचा तो त्यांनी लोककल्याणासाठी खर्च केला. असा त्यांचा काटेकोर व्यवहार होता. ‘‘दौलतीची एक कवडी मजकडे निघाली तर कवडीच्या पाच कवडय़ा देईन.’’ असे त्या म्हणत असत. त्यांची अर्थनीती अतिशय पारदर्शी होती. राज्यातील कष्टकरी, शेतकरी, कामगार, उपेक्षित, वंचित घटक हा त्यांच्या विकासाचा केंद्रबिंदु होता. त्यामुळेच त्यांनी आदिवासी, भिल्ल, भूमिहीन, शेतमजूर यांना त्यांनी माळरान, पडीक जमिनी कसावयास देऊन त्यांना जगण्याचे साधन निर्माण करून दिले. जमिनी कसताना त्या जमिनीत वीस फळझाडे लावावीत. त्यातील 11 फळझाडे सरकारची व 9 फळझाडे शेतकऱ्याची असे सूत्र ठरले. त्यांनी उत्पन्नवाढीसाठी वेगवेगळ्या तंत्राचा वापर केला. ग्रामविकास करताना चुकीचे काम करणाऱ्याला त्या खडसावत असत. महाराष्ट्र शासनाची आजच्या काळातील वृक्ष लागवडीची योजना त्यांनी त्या काळात राबवली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वृक्ष लागवडीची कामे त्यांच्या काळात झाली. त्या काळात भारतातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना पायी जाण्यासाठी रस्ते तयार केले. याच रस्त्यावर आज भारत सरकारचे राष्ट्रीय महामार्ग होत आहेत. सैन्य व्यवस्थापन चोख ठेवले. शिवाय स्वतंत्रपणे महिलांची फौज निर्माण करणाऱ्या त्या एकमेव महिला प्रशासक होत्या. एवढेच नाही तर राज्यात स्वतंत्र अशी पोलीस यंत्रणाही त्यांनी उभी केली. न्यायदान तर त्या अशा करत की दोन्ही बाजू त्यांना दुवा देत असत. धर्मनिरपेक्षता त्यांच्या अंगी ठाई ठाई होती. त्यांनी अनेक मुस्लिम पीर, दर्गा यांना देणगी दिली. राज्यकारभार करताना त्यांनी जुन्या रुढीपरंपरांना त्यांनी कायमच विरोध केला होता. सती जाणे, हुंडा घेणे, केशवपण या जुन्या वाईट चालीरीती मोडीत काढण्याचा प्रयत्न केला.
स्त्रियांच्या हक्काविषयी त्यांना विशेष जागरुकता होती. विधवेच्या संपत्तीची लुबाडणूक, तिच्या व्यावहारिक अज्ञानाचा गैरफायदा आणि तिचे शोषण सार्वत्रिक असण्याच्या काळात अहिल्यादेवींनी विधवांना अभय दिल्याचे आणि स्वतःची संपत्ती स्वतःच्या इच्छेप्रमाणे खर्च करण्यासाठी त्यांना प्रवृत्त केल्याचे अनेक पुरावे आहेत. उदार धर्मकारण, कल्याणकारी राजकारण व समाजकारण करणाऱ्या अहिल्यादेवी होळकरांनी आपल्या महेश्वरच्या वाडय़ावर जी प्रतिज्ञा लिहिली आहे ती त्यांच्या विचारांची आणि जीवन विचाराची बैठक स्पष्ट करणारी आहे. ती आजच्या सत्ताधाऱ्यांना जागे करणारी आहे.
‘‘माझे कार्य प्रजेला सुखी करणे आहे. माझ्या प्रत्येक कृतीला मी स्वतः जबाबदार आहे.सत्तेच्या अधिकारामुळे मी जेथे जे जे काही करत आहे
त्या प्रत्येक कृत्याचा जाब मला परमेश्वरापुढे देणे आहे. परमेश्वराने ज्या जबाबदाऱ्या माझ्यावर सोपवल्या आहेत.त्या मला पार पाडायच्या आहेत.’’
पुरुषप्रधान व्यवस्थेत व मध्ययुगीन अंदाधुंदीच्या काळात स्वच्छ आणि शिस्तबद्ध कारभार करणाऱ्या त्या रणरागिणी होत्या. मराठा कालखंडात राजमाता जिजाऊ, येसूबाई, ताराबाई अशा कर्तबगार स्त्रियांची मालिका दिसून येते. त्यात अहिल्यादेवी होळकरांचे नाव लोककल्याणकारी व कर्तबगार म्हणून नोंदवले गेले.
(लेखक महिला कला महाविद्यालय,छत्रपती संभाजीनगरचे प्राचार्य आहेत.)