डाळ शिजत नाही…

>> साधना गोरे [email protected]

लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी गेल्यावर तिथल्या मुलांनी मुंबईच्या मुलांना ‘मुंबईचा डाळ-भात’ किंवा ‘मुंबईचा वडापाव’ म्हणून चिडवणं अनेकांनी अनुभवलं असेल. सुट्टीत आमच्या आजोळी दहा-बारा मोठी माणसं अन् त्याहून दुप्पट चिल्लर पार्टी असायची. एवढय़ा सगळ्यांचा दोन्ही वेळचा स्वयंपाक बऱ्याचदा मोठी मामीच करायची. कधी आजी किंवा एखादी मावशी करे. तेव्हा आमच्या गावाकडे भात हा सणासुदीचा पदार्थ असे, पण पाहुण्यांची, त्यातही मुंबईची मुलं आहेत म्हणून मामी दुपारच्या जेवणात तरी हमखास भात करायची. एकदा माझा मावसभाऊ म्हणाला, “मामी, आज भातासोबत खायला डाळ पण करा.’’ मामीला वाटलं, पोरगं मागून मागून डाळ तर मागतंय. “ती इतक्यात कशी शिजायची? उद्या सकाळी करू की,’’ असं म्हणून मामीने सकाळच्या जेवणात सगळ्या मुलांना डाळ-भात वाढला. ताटात डाळ, कांदा आणि भात बघून आम्ही पोरं हसतच सुटलो होतो. मग एका मावशीने सांगितलं की, “डाळ म्हणजे ‘ही’ नाय काय! तुरीच्या डाळीचं वरण असतं ते.’’ नंतरच्या प्रत्येक सुट्टीत मामी हा प्रसंग आठवे आणि तुरीचं वरण करून देई.

सांगायचा मुद्दा असा की, डाळभात हा मुंबईकरांच्या जेवणाचा अविभाज्य भाग आहे खरा, पण उर्वरित महाराष्ट्रात तूर, मूग, मटकी, हरभरा, उडीद, हुलगे, पावटा, घेवडा, वाल इ. कडधान्यांच्या डाळी जेवणात कोणत्या ना कोणत्या रूपात असतात. या कडधान्यांचे दोन समान भाग होतात म्हणून त्यांना संस्पृतमध्ये ‘द्विदल’ म्हटलं जातं. त्याचीच द्विअल – ड्विअल – डाळ अशी रूपं बदलत गेल्याचं पृ. पां. पुलकर्णी सांगतात. पुढं ते म्हणतात, “तूर, मूग, उडीद ही धान्ये मूळ हिंदुस्थानातील नसून उष्ण आफ्रिकेतील असावीत व साधारण तीन हजार वर्षांपूर्वी हिंदुस्थानात आणली असावीत.’’

संस्पृतमध्ये ‘दल’ / ‘दाल’ असेही शब्द आहेत. त्याची प्रापृतमध्ये ‘दाली’, बंगालीत ‘डाल’, उडियामध्ये ‘डाली’, हिंदी-पंजाबीमध्ये ‘दाल’, सिंधीमध्ये ‘डारू’, गुजरातीमध्ये ‘डाळ’ अशी रूपं होतात. महाराष्ट्रात देशावर ‘डाळ’ऐवजी ‘दाळ’ म्हटलं जातं. डाळीच्या अर्ध्या भागाला उद्देशून ‘डाळिंबी’ असाही एक शब्द आहे. कोकणात काही भागांत वालाच्या उसळीला ‘डाळिंबीची उसळ’ म्हणतात, पण या उसळीचा डाळिंब फळाशी काहीएक संबंध नाही.

पालेभाज्या करताना त्यात बऱ्याचदा मूग, मटकी, हरभरा यांपैकी कोणती ना कोणती डाळ वापरली जाते. शिवाय डाळ कांदा, डाळ वांगे, डाळ भोपळा, आंबेडाळ, दाल खिचडी, दाल बाटी, दाल मोठ असे नावातच डाळ असणारे पदार्थही कितीतरी आहेत. अशा या डाळीवरून काही म्हणीही आहेत.

डाळी, विशेषतः हरभरा व तुरीच्या डाळी शिजायला फार वेळ घेतात. डाळीच्या या न शिजण्याच्या वैशिष्टय़ावरून एखाद्याच्या लबाडय़ा, कपट, डावपेच यशस्वी झाले की, ‘डाळ शिजली / गळली’ यांसारखे शब्दप्रयोग केले जातात. याउलट असले लबाड उद्योग करूनही ते यशस्वी झाले नाहीत तर ‘डाळ शिजली नाही / गळली नाही’ असा नकारार्थी प्रयोगही केला जातो. एखादा मनुष्य त्याची कामं यशस्वी व्हावीत म्हणून खूप प्रयत्न करतो, पण त्यातली कोणतीच गोष्ट साधत नाही. अशा वेळी ‘डाळ शिजत नाही आणि वरण उकळत नाही’ ही म्हण वापरली जाते.
घरातलं एखादं मूल उर्मट वागत असेल, ऐकत नसेल तर या पोराने ‘माझी डाळ नासवली किंवा महाग केली’ असं म्हटलं जातं. स्वतःचाच फायदा करून घेणं या अर्थानं ‘आपल्या पोळीवर तूप ओढणं’ हा वाक्प्रयोग तुम्ही बऱ्याचदा वापरला असेल. याच अर्थाचा ‘आपल्या पोळीवर डाळ ओढणं’ असाही वाक्प्रयोग आहे.

बऱ्याच जणांना डाळ-भाकरी खाल्ल्याशिवाय पोट भरल्याचं समाधान मिळत नाही. त्यावरून ‘दाल रोटी, सब बात खोटी’ अशी म्हण वापरली जाते. सगळ्यांच्याच घरी काही गोष्टी नित्याच्या असतात. त्यात फार वेगळं असं काही नसतं. हा भावार्थ सांगणारी ‘डाळीसाळीचे कांडण नि सवतीसवतींचे भांडण’ अशी म्हण आहे.

घरातल्या बायका घरच्या शिस्तीत असल्या पाहिजेत, असं आपल्या पुरुषप्रधान समाजाला नेहमीच वाटत आलं आहे. ही समाजधारणा कथन करणारी एक म्हण आहे – ‘डाळ घालावी दाटणीत आणि बायको / लेक घालावी अटणीत’. अटणी म्हणजे सोन्या-चांदीसारखे धातू अटवण्याचे पात्र. वरणाची डाळ चांगली शिजल्याशिवाय वरण मिळून येत नाही, डाळ पाणी वेगळे होते. त्याप्रमाणे बायकोस मुलीस चांगले धाकात ठेवल्याशिवाय तिला चांगले गुण लागत नाहीत, असा अर्थ सांगणारी ही म्हण आहे.