
>> पूजा सामंत
यंदाच्या मार्च महिन्यात ‘ज्युली’ या चित्रपटाला 50 वर्षे पूर्ण झाली. या प्रेमकथेने संपूर्ण देशात उत्पन्नाचे नवे विक्रम प्रस्थापित केले होते. ख्रिस्ती नायिका आणि हिंदू नायक यांच्या प्रेमकथेला कुमारी माता या विषयाचा ट्विस्ट दिला गेल्याने ही कथा पारंपरिक प्रेमकथांच्या चौकटीत मोडली गेली नाही. दाक्षिणात्य नायिका लक्ष्मी आणि हिंदीत नव्याने पदार्पण केलेला अतिशय देखणा विक्रम मकानदार हा नायक होता. परंतु विक्रमला नंतर अपेक्षित यश मिळाले नाही. विक्रमने काही चित्रपटांची निर्मिती केली आणि चित्रपट वितरणाकडे मोहरा वळवला. त्याची ‘ज्युली’नंतरची वाटचाल, त्याचे अनुभव त्याच्याच शब्दांत…
माझा जन्म हुबळी-कर्नाटक राज्यातला. घरची आर्थिक परिस्थिती उत्तम होती. मोठं संयुक्त कुटुंब होतं. आम्ही अकरा भावंडं होतो. आम्ही लहान असताना तेव्हा घराघरातून कुठे तबल्याचा नाद ऐकू येई, तर कुठे सतारीचे सूर आसमंतात गुंजत! एकूणच कला-सांस्कृतिक माहौल आमच्या हुबळीमध्ये होता. पण मनोरंजनाची साधने किंवा एकही थिएटर नव्हतं. साधा माइकही नव्हता. आम्हाला अभिनयाची संधी किंवा सांस्कृतिक मंच मिळावा असं खूप वाटायचं. आज तब्बल 70 वर्षांनंतरही यात विशेष बदल घडलेला नाही. तर गावात चित्रपटासाठी थिएटर नव्हतं, मग मी अभिनयाकडे कसा वळलो?
नऊ वर्षांचा असताना मी शेजारच्या गावात नातेवाईकांकडे गेलो असताना तिथे जवळच्या सिनेमागृहात ‘नागिन’ हा सिनेमा पाहिला. 1954 मध्ये या सिनेमाने माझ्यावर भलतंच गारुड केलं. मी संपूर्ण आठवडा हाच सिनेमा पाहत राहिलो आणि मनाने अभिनयाच्या दुनियेत पोहोचलो. शिक्षण चालू राहिलं, पण मनाच्या एका कोपऱ्यात अभिनयाची दुनिया जिवंत होती. दर शुक्रवारी मुंबईहून आमचा चुलत भाऊ गावी यायचा. येताना तो ‘स्क्रीन’ नावाचं साप्ताहिक घेऊन यायचा. त्यात ‘नवे चेहरे’ हवेत अशी एक जाहिरात होती. तसंच एफटीआय – फिल्म्स अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियामध्ये प्रवेशासाठी जाहिरात होती. माझ्यासाठी ही सुवर्णसंधी चालून आली होती. मी अर्ज भरून पाठवला आणि मला मुलाखतीसाठी पुण्याला बोलावणं आलं. घरी सगळ्यांना विश्वासात घेऊन मी पुणे गाठलं. इथे माझा इंटरव्ह्यू घेतला रोशन तनेजा यांनी. त्यांनी माझी निवड करावी म्हणून मी त्यांना घाबरून म्हटलं, ‘जो आप कहेंगे वैसी आक्टिंग करूँगा, मैंने आक्टिंग सीखी नहीं है!’ माझं हे उत्तर ऐकून ते भलतेच खुश झाले. कोऱ्या पाटीवर (अभिनयाची) अक्षरं गिरवणं सोपं असतं, पण जी पाटी अक्षरांनी आधीच भरलेली असते त्यावर नवी अक्षरं उमटवणं कठीणच असतं. तर असा मी पुणे येथील एफटीआयमध्ये शिकलो. डॅनी, असरानी, शत्रुघ्न सिन्हा माझे तेव्हा सहकारी होते. हा काळ खूप अविस्मरणीय आठवणींचा होता.
प्रख्यात निर्माते बी. नागी रेड्डी आणि दिग्दर्शक सेथुमाधवन त्यांच्या आगामी ‘ज्युली’ फिल्मसाठी कास्टिंग करत होते. ऑडिशनसाठी ते मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये अनेक कलाकारांच्या मुलाखती घेत होते. तिथे माझा नंबर लागला. त्यांच्या ऑडिशनची पद्धत वेगळी होती. नवोदित कलाकाराला त्याची मिरर इमेज दिसावी अशा रीतीने त्यांनी तिथे आरसे ठेवले होते. त्याच आरशात पाहून त्यांनी मला ‘ज्युली’साठी कास्ट केलं. मला वाटलं जर भूमिका मिळालीच तर त्यांना 10-15 हजार मानधन म्हणून मागूया. पण अवघ्या 5-10 मिनिटांत त्यांनी मला ‘ज्युली’ सिनेमासाठी कास्ट केलं आणि एक लाख रूपये मानधन देऊ केलं. आनंदाने बेहोष व्हायचा बाकी होतो मी. दुसऱ्याच दिवशी विमानाने मला चेन्नईला नेण्यात आलं. तिथे गेल्यावर कॉस्चुम देण्यात आला आणि मी थेट सेटवर पोहोचलो. मला माझी नायिका, सीन्सविषयी काहीही सांगण्यात आलं नव्हतं. सेटवर पोहोचलो आणि एका कोपऱ्यात रेकॉर्डवर रोमँटिक गीत सुरू झालं. “भूल गया सब कुछ…’’ निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनी, कोरियोग्राफरने कोणीही मला कल्पना दिली नव्हती. पहिला सिनेमा, ना अभिनयाचा अनुभव, ना नायिकेशी परिचय. डायरेक्ट ‘भूल गया सब कुछ…’ हे रोमँटिक गीत करायचं होतं. वास्तविक माझा आणि लक्ष्मीचा परिचय व्हायला हवा होता. त्याने गाण्याचं शूटिंग अजून चांगलं झालं असतं. पहिल्याच दिवशीच्या या अनुभवाने मी खट्टू झालो.
लक्ष्मी शॉट संपला की तिच्या खुर्चीवर जाऊन बसत असे. आमच्यात कसलंच बॉण्डिंग झालं नाही. उलट तिच्यासोबत प्रणय प्रसंग कसे रंगवावेत हा यक्षप्रश्न होता. तिची वागणूक आढय़ातखोर होती. रुक्ष होती. गाण्यापुरता प्रणय प्रसंग कसा रंगवायचा हा प्रश्नच होता. काहीही न सुचल्याने मी तिला इतकंच म्हटलं, तुझे बांधलेले केस मोकळे सोड. कॅमेरा सुरू झाल्यावर मी तिच्या केसांमध्ये माझा चेहरा लपवत तो सीन केला. अर्थात सिनेमातील अन्य कलाकार ओमप्रकाश, नादिरा, आगा, उत्पल दत्त आणि छोटी श्रीदेवी असे मातब्बर कलाकार. राजेश रोशन यांचे सदाबहार संगीत अशा अनेक कारणांनी ‘ज्युली’ खूप गाजला. या सिनेमाच्या यशानंतर मला माझा बायोडेटा कधी सांगावा लागला नाही. पण आजही वाटतं की माझ्या कारकिर्दीची सुरुवात नायिकाप्रधान चित्रपटाने व्हायला नको होती.
करिअरच्या पुढच्या टप्प्यात आदमी सडक का, संकोच, जब अंधेरा होता है, रंगा खुश, तुफान… असे चित्रपट केले. ते चालले नाहीत आणि मी निमिर्तीकडे वळलो. अभिनेत्री स्मिता पाटीलने मला निर्मितीत जाण्यासाठी सुचवलं आणि मी ‘सीतम’ सिनेमा काढला. त्या काळात जे सुचलं ते मी केलं. फार वाट पाहिली नाही. स्मिता पाटीलमुळे निर्माता झालो. या सिनेमाने खूप अनुभव दिला. पण जे काही सिनेमे केले त्यांना सुपर हिट म्हणता येणार नाही. मग मी चित्रपट वितरक झालो. ज्या ठिकाणी अपयश लाभलं तिथे मी रेंगाळलो नाही. ‘सितम’ हा माझा निर्माता अभिनेता अशी दुहेरी जबाबदारी असलेला पहिला चित्रपट होता. बऱ्याचदा कलाकार ‘वन फिल्म वंडर’ सिद्ध होतात. योग्य संधीची वाट पाहत बसतात त्यात उमेदीची वर्षं खर्ची होतात. मला तसं करायचं नव्हतं. म्हणूनच मी निर्माता-वितरक झालो. प्रसिद्ध निर्माते बी. आर. इशारा यांच्याशी परिचय माझ्या एफटीआय दिवसांपासून होता. मी त्यांचे मार्गदर्शन व मदत घेतली. त्या-त्या वेळी जे-जे योग्य वाटलं, ते मी प्रामाणिकपणे करत गेलो. नैराश्याच्या गर्तेत कधी अडकलो नाही. पुढे मार्गक्रमण करत राहिलो. हल्ली नवी पिढी लवकर डिप्रेशनमध्ये जाते याचं वाईट वाटतं.
मग मी कॉर्पोरट इव्हेंट्सची कंपनी स्थापन केली. सुदैवाने इव्हेन्ट मॅनेजमेंट कंपनीची भरभराट झाली आणि नामांकित कंपन्यांचे इव्हेंट्स मी उत्तमपणे पार पाडले. नंतर मी चायनीज रेस्टारंट सुरू केलं. ते उत्तम चाललं. के. आसिफ, व्ही. शांताराम, राज कपूर, गुरुदत्त यांनी ज्या पॅशनने चित्रपट बनवले ते चित्र आज दिसत नाहीत. पण मी आशावादी आहे. चित्रपट बनावेत, प्रोजेक्ट बनू नयेत. त्याने दर्जेदार चित्रपट घडतील. सगळेच चित्रपट ‘क्लासिक्स’ बनत नाहीत, पण ते सवंग नसावेत असं मला वाटतं.