
>> दिव्या नेरुरकर–सौदागर
आईबरोबर होणाऱया सततच्या खटक्यांचा खोल परिणाम आरववर होत होता. तो त्याच्या आईपासून भावनिकदृष्टय़ा लांब जात होताच, शिवाय कुठेतरी कोडगेपणा आणि निर्ढावलेपण त्याच्या बोलण्यात, वागण्यात येत होते. जरी त्याला वडिलांचा आणि मावशीचा आधार असला तरी ‘माझी आई माझा भावनिक आधार होऊ शकत नाही’ ही भावना त्याला खात होती. शिवाय तो पौगंडावस्थेत प्रवेश करत असल्याने शीघ्रकोपी, उद्दाम, आततायी झाला होता. मुलगा आणि आईच्या भावनिक नात्याच्या वाटचालीबद्दल…
आरव (नाव बदलले आहे) नेहमीसारखा समुपदेशनाला आला तो हसत हसतच. त्याच्या हास्याला नेहमीसारखीच करुणेची किनारही होती. “आईने आता काय शिल्लक ठेवलंय? तिने काल मला साफ सांगितलं की, ती यापुढे माझ्या शाळेत पाऊल ठेवणार नाही की माझ्या अभ्यासातही लक्ष देणार नाही.’’ असं म्हणून तो शांत झाला. “का असं म्हणाली ती?’’ असं विचारल्यावर तो गंभीर होत म्हणाला, “कारण मी तिला काल उलट बोललो.’’
आरवचे आणि त्याच्या आईचे खटके हे दोन-तीन दिवसांआड ठरलेले असायचेच. दोघांमधून विस्तव जात नव्हता. आरवच्या वडिलांनी आणि मावशीने दोघांमध्ये समेट व्हावा म्हणून भरपूर प्रयत्न केले होते. पण त्यांचे संबंध कायम बिघडलेले होते. शेवटचा पर्याय म्हणून मावशीने समुपदेशनाचा मार्ग आरवच्या आईला सांगून पहिला. येण्याआधी तिने भरपूर अटी घातल्या होत्या. जशा की, ती एकटीच आधी समुपदेशकांना भेटणार, सारखी सारखी सत्रांना येणार नाही, आरव आणि ती एकत्र जाणार नाहीत. त्याप्रमाणे एक दिवस ती आणि आरवचे वडील असं दोघंही येऊन गेली.
आरवच्या आईला सत्राला बोलावण्यापूर्वी आरव आणि त्याचे वडील तिची पार्श्वभूमी, तिचा स्वभाव सांगण्यासाठी आले होतेच. महत्त्वाचं म्हणजे आरवच्या मावशीनेही सत्रामध्ये यायची तयारी दाखवली होती. त्या तिघांनीही आरवच्या आईबाबत एकच सूर लावला होता. तो म्हणजे, “ती स्वतपुढे दुसऱयाचे ऐकून घेत नाही. स्वतच्या चुका मान्य करत नाही. स्वतपुढे इतरांना महत्त्व देत नाही’’ आणि या सगळ्याचा प्रत्यय जेव्हा ती सत्रामध्ये आली तेव्हाच आला.
“मला या घरात काहीही महत्त्व नाही आणि माझ्या मुलाच्या तर मी खिजगणतीतही नाही.’’ सत्राला बसताना त्याची आई स्वतची बाजू मांडत होती. तिने घरासाठीचे कष्ट, घरातल्यांसाठी केलेले त्याग (करीअरला तिलांजली देणं) या गोष्टीही सांगितल्या. “पण तू तर ऑफिसला जाते आहेसच. आरवचा यात संबंध येतोय कुठे?’’ आरवच्या वडिलांनी त्याच्या आईला लगेच विचारलं. त्याबरोबर तिच्या चेहऱयाचे हावभाव बदलले आणि ती चिडून म्हणाली, “म्हणजे मीच दोषी आहे. मी स्वतला महत्त्व देतेय हे तुम्हाला सगळ्यांना बोचतंय. मी आयुष्यात पुढे गेलेली तुम्हाला बघवत नसणार. फक्त चूल आणि मूल करायचंय न मी’’ असं बोलता बोलता ती रडायला लागली आणि पर्स घेऊन बाहेर पडली.
आरवच्या आईबद्दल बोलायचं झाल्यास तिचा स्वभाव हा ‘आत्मलीन’ (सेल्फ अब्सॉर्ब्ड) या प्रकारातील होता. या स्वभाव वैशिष्टय़ाच्या व्यक्ती स्वतला अतिशय महत्त्व देतात. त्यांना इतरांच्या भावभावनांशी काहीही देणंघेणं नसते. स्वतच्या आवडीनिवडी, स्वतच्या यशोगाथा किंवा स्वतला येणाऱया क्षुल्लक अडचणी यामध्ये त्या प्रचंड गुरफटलेल्या असतात. त्यांच्या विश्वात त्यांच्या स्वतशिवाय इतरांना स्थान नसते. स्वतचं महत्त्व इतरांना कळावं यासाठी या व्यक्तींचा आटापिटा असतो आणि त्यासाठी त्या लक्ष वेधून घेण्याचाही प्रयत्न करतात. त्यांच्या वैयक्तिक किंवा सामाजिक नात्यांमध्येही त्या स्वतला, त्यांच्या अडचणींना महत्त्वाचं मानतात. जर त्याची दखल घेतली गेली नाही तर या व्यक्ती पराकोटीच्या संतापतात आणि सहानुभूतीसाठी कुठच्याही थराला जाऊन वागतात.
आरवची आई अशीच वागत होती, ज्याचा परिणाम आरवच्या घरावर झालाच होता. शिवाय आरव पौगंडावस्थेत होता त्यामुळे तो शीघ्रकोपी, उद्दाम, आततायी झाला होता. बराचसा वेळ मोबाईल आणि बाहेर मित्रांबरोबर घालवत होता. त्याच्या वडिलांनी त्याला समजावून पाहिलं, पण तेही एका मर्यादेच्या बाहेर समजावू शकत नव्हते. म्हणूनच त्यांनी समुपदेशन ठरवले आणि त्याप्रमाणे सत्रे सुरू केली. आरव व्यक्त होत होता आणि थोडाफार स्वतमध्ये बदल घडवत होता. त्याने आईकडच्या अपेक्षा कमी केल्या होत्या, पण कुठेतरी ‘माझी आई मला पाहिजे’ ही अपेक्षा होतीच. याउलट आईचं वागणं हे दिवसेंदिवस नकारात्मकतेकडेच झुकलं होतं.
या वेळीही आरवच्या आईने असंच काहीसं केलं. आरवचा अभ्यास ती घेत होती. तेव्हा तो जरा कंटाळला म्हणून त्याने तिला सांगितलं की, “अभ्यास नंतर करू.’’ तशी ती चिडली आणि म्हणाली, “मी माझी कामे टाकून तुझ्यावर वेळ घालवतेय.’’ या तिच्या वाक्याचा आरवला राग आला आणि तो तिला पटकन म्हणाला, “माहिती आहे तुझी कामे. व्हॉट्सअॅप आणि इन्स्टा.’’ यावरून दोघांचं कडाक्याचं भांडण झालं. आरवच्या आईने रागारागाने त्याचा अभ्यास घेतलाच नाही. आरव हा अभ्यासासाठी आईवर अवलंबून असायचा. कारण पहिल्यापासून त्याचा अभ्यास आईच घेत होती. आता आठवीत आल्यावर त्याला काही विषयांसाठी आईवर अवलंबून राहावं लागत होतं. परीक्षा देतानाही तो तिच्यासोबतच वाचन, लेखन करत होता. मात्र त्या दिवशी आरवच्या पेपरच्या वेळीच आदल्या रात्री तिने चिडून सांगितलं, “माझा अपमान मी तुझ्याकडून नाही सहन करू शकत. माझी माफी माग नाहीतर मी तुझा अभ्यास घेणारच नाही’’ असं बोलून तिने त्याचा अभ्यास घेणं बंद केलं. आरवही मग संतापला. “मी कंटाळा आलाय एवढं बोललो तर काय चूक केली?’’ असं वडिलाना सांगत त्याने तिची माफी मागणार नाही असं ठणकावलं. वडिलांनी त्याच्या आईला समजावून पाहिलं, पण पालथ्या घडय़ावर पाणी होतं. आरवनेही मग अभ्यास केलाच नाही आणि त्याच्या आईनेही त्याला अभ्यासाला बसवलंच नाही.
“मला एक सांग आरव, यात नुकसान कोणाचं झालं?’’ त्याला हा प्रश्न खूप लागला. “मला माहीत आहे, पण ती काहीच समजून घेत नाही. मी काय, बाबा काय तिच्या मूडप्रमाणे हसतो, शांत राहतो. ती घरी आली की, तिच्या चेहऱयाकडे बघून वागायचं कसं ते ठरवतो. त्या दिवशी बाबांचं आणि तिचं भांडण झालं तर तिने आम्हाला जेवायला वाढलं नाही. स्वत मात्र बेडरूमध्ये जाऊन जेवली. मी काय केलेलं त्या वेळी, पण ती मला बाबांच्या टीममधला समजते.’’ आरवचा बंडखोरपणा बरेचसे प्रश्न उपस्थित करत होता. त्याच्या वडिलांनी बोलायला सुरुवात केली. “मी आरवला मुळीच दोष देणार नाही. कारण तो कशातून जात असेल हे मला माहीत आहे. मी बायकोकडून अपेक्षा नाही ठेवू शकत, पण याच्याकडून तर नक्कीच ठेऊ शकतो. म्हणून तर मी याची सत्र सुरू केलेली आहेत.’’ आरवच्या मावशीनेही मग तिच्या बहिणीची पार्श्वभूमी सांगितली. आरवच्या आईचं बालपण हे तिच्या आईच्या धाकात गेलं होतं. जशी ती मोठी होत गेली तसं तिचं जग बदललं आणि लग्नानंतर अजूनच. कायम ‘ताठ मानेने जगायचं तर स्वतचं महत्त्व इतरांना ठरवायचं असतं’ असा ग्रह तिने ठेवला होता आणि ती तशीच वागत होती, पण ते करताना तिने काय गमावलं होतं हे तिला समजलंच नव्हतं.
मात्र आरव पूर्णपणे स्वतला बदलत होता. त्याला स्वतचं जग तयार करायचं होतं. स्वप्नं पूर्ण करायची होती आणि स्वावलंबी व्हायचं होतं. त्या दिशेने त्याने वाटचाल सुरू केली होती.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)