
<<< अजित कवटकर >>>
पर्याप्त प्रमाणात संसाधनं नसतील तर प्रगतीला खीळ बसू शकते, आपल्या वर्चस्वाला धक्का लागू शकतो आणि याउलट जर आपल्याकडे संसाधनांचा अमर्याद साठा असेल तर आपण जगावर श्रेष्ठत्व गाजवू शकतो, याची जाणीव जगातील मोठ्या राष्ट्रांना आहे. यासाठीच संसाधनसंपन्न प्रदेश, महत्त्वाचे व्यापारमार्ग, श्रीमंत बाजारपेठा, कच्च्या मालाची केंद्रे वगैरेंवर ताबा मिळविण्यासाठी आजची सर्व आक्रमकता आणि आक्रमणे होताना दिसत आहे. ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ म्हणतात ते बहुदा यालाच.
इराण-इस्रायल युद्ध, चीन-तैवान संघर्ष, भारत-पाकिस्तान तणाव, भारत-चीन सीमावाद, थायलंड-कम्बोडिया धुसफूस, साऊथ-चायना समुद्रातील चीनच्या अतिक्रमणामुळे त्यांचे तेथील देशांबरोबर उडत असलेले खटके, उत्तर कोरिया – दक्षिण कोरिया तणाव… आशिया खंडावरील अनेक देश आज युद्धात गुंतले आहेत वा युद्धाची तयारी करत आहेत. हा खंड आज इतका अस्थिर, अस्वस्थ झाला आहे की कोणत्या दोघांमधील संघर्षाची ठिणगी ही जागतिक युद्धाचा वणवा पेटविण्यास कारणीभूत ठरेल हे सांगता येत नाही.
सुपरपॉवर होण्याच्या शर्यतीतून आकार घेत असलेले अमेरिका – चीन व्यापार युद्ध जागतिक ध्रुवीकरणास कारणीभूत ठरत आहे. आपण ‘बिग डॅडी’ असल्याची जाणीव दुसऱ्यांना करून देण्यासाठी नेहमी इतरांच्या अंतर्गत प्रश्नांत हस्तक्षेप करून मध्यस्थी करण्याचा अमेरिकेचा अट्टहास हा जरी काही ठिकाणी परिस्थिती तात्पुरती आटोक्यात आणत असला तरी ती गुंतागुंत अधिक जटील होत आहे. काही राष्ट्रांमध्ये सत्तापालट घडवून आणण्याच्या उद्देशाने निर्माण केली गेलेली अनागोंदी ही त्या राष्ट्राला लष्करी राजवटीखाली आणू शकते किंवा त्यावर दहशतवादी संघटनांची हुकुमत प्रस्थापित करू शकते. काही देश-प्रदेश हे यापूर्वीच अतिरेकी अड्डे झाले आहेत. नवनवीन संहारक अस्त्रे – शस्त्रे निर्माण करण्याची राष्ट्राराष्ट्रांत दिसत असलेली घाई ही आता अधिक राक्षसी होत चालली आहे. जगात चाललेल्या या आक्रमकतेचे पर्यवसान तिसऱ्या जागतिक महायुद्धात होईल का?
अमेरिका व तत्कालिन सोविएत युनियनचे तेव्हा अर्ध्यावरच आटोपलेले शीतयुद्ध बहुदा आता या नव्या रूपात पुन्हा सुरू झाले असावे. रशियाला चीन, उत्तर कोरिया व अनेक इस्लामी राष्ट्रांचा उघडपणे मिळत असलेला पाठिंबा हा या पुनरुज्जीवनाला कारणीभूत असेल. त्यातच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी अशा व्यक्तीची फेरनिवड झाली आहे की जो आपले वर्चस्व अबाधित राखण्यासाठी काहीही म्हणजे काहीही करू शकतो. रशिया व चीनमध्ये लोकशाही, संविधान वगैरे केवळ कागदावरच आहेत. या दोन देशांमध्ये आज पराकोटीची हुकुमशाही चालते हे कोणीही नाकारू शकत नाही आणि या दोन्ही देशांचे समर्थन करत त्यांच्या अतिरेकाला उघडपणे पाठिंबा देणाऱ्यांपैकी बहुतेक त्याच श्रेणीतले आहेत.
युद्धातून विनाशाकडे घेऊन जाणाऱ्या या जागतिक अस्थिरतेला जेवढे, न भरलेल्या ऐतिहासिक जखमा, नव्या श्रीमंतीने जागृत झालेल्या विस्तारवादी महत्त्वाकांक्षा, धर्मांधता, संसाधनांसाठीची अपरिहार्यता इत्यादी कारणीभूत आहेत. चीनची विघ्नसंतोषी भूमिका या आगीत तेल ओतण्याचे काम करत आहे. आज दोन देशांमध्ये सुरू असलेली अनेक युद्धं जरी स्थानिक मर्यादेची असली तरी त्या दोघांना उघड वा छुपा पाठिंबा, रसद, युद्धसाहित्य, आर्थिक मदत पुरवणारे त्यांचे अनेक समर्थक देश आहेत, जे एक ठरावीक मर्यादा उलटल्यानंतर त्यात उघडपणे उडी घेणार. असे जेव्हा होणार तेव्हा ते युद्ध स्थानिक न राहता व्यापक होत संपूर्ण जगाला यात हळूहळू खेचून घेणार. पहिले व दुसरे महायुद्ध हे या अशाच दोघांच्या भांडणातून महायुद्धात परिवर्तित झाले. आज बहुतेक शेजारी राष्ट्रांमध्ये सुरू असलेली धुसफूस लक्षात घेता कोणा दोघांचे भांडण तिसऱ्या महायुद्धाला विशेष कारणीभूत ठरू शकते, हेच बघणे आता बाकी आहे.
जागतिक महायुद्धच काय, पण दोन देशांमध्ये युद्धाची एक दिवसीय वा पाच दिवसीय मैत्रीपूर्ण लढाईदेखील होऊ नये, हीच प्रार्थना मानवतावाद करतो. आज जिथे युद्धं सुरू आहेत, म्हणजे जिथे सतत आग ओकली जात आहे, तिथे आता केवळ मानवी अस्तित्वाचे अवशेष उरलेले पाहायला मिळतात. एखाद्या सुंदर-संपन्न -प्रगतीशील-प्राणीसृष्टीने बहरलेल्या ठिकाणांचे स्मशानभूमीत रूपांतर करण्याची क्षमता व सामर्थ्य आजच्या अणुयुद्धात आहे. एक मेगाटन अणुबॉम्ब जर जवळपास पन्नास चौरस किलोमीटरच्या भूभागाची राख करू शकत असेल तर जगामध्ये असलेल्या एकूण अणुबॉम्बची संख्या लक्षात घेतल्यास, पृथ्वीचा एखाद् दुसरा छोटा कोपरादेखील या दुर्दैवापासून सुरक्षित राहणार नाही. मानवाने आजपर्यंत कष्टाने जे काही उभारलं ते क्षणार्धात मातीमोल करण्याची ताकद युद्धात आहे. आशावादी विचार केला तर जागतिक महायुद्ध हे जगाचा विकास – प्रगती – जीवन एक शतक मागे लोटू शकतं. पण तर्कशुद्ध विचार केल्यास, सर्वव्यापक तिसरे जागतिक महायुद्ध हे या पृथ्वीवरील जीवनाचा सर्वनाश करू शकतं. डायनॉसोर जसा सर्वशक्तीशाली झाला आणि शेवटी स्वतःच्याच अस्तित्वावर उठला त्याच मार्गाने आजची मानवजात जात आहे. आज प्रत्येकाला जगावर निर्णायक नियंत्रण ठेवण्याची अभिलाषा आहे आणि त्यासाठीच चाललेले धाडसी प्रयत्न हे या अस्थिरतेला कारणीभूत आहेत.
आज अनेक देश हे लोकशाहीच्या मार्गाने हुकुमशाही प्रस्थापित करण्याच्या घाईत आहेत. कॅनडा व ग्रीनलॅण्ड नंतर आता मेक्सिकोच्या आखाताकडे नजर लावून बसलेला अमेरिका आणि संपूर्ण दक्षिण-पूर्व आशिया खंडावर आपली ‘कनेक्टिव्हिटी’ लादू पाहणारा चीन हे दोघेही एकाच माळेचे मणी आहेत. त्यातच रशिया व इस्रायलने धारण केलेली आक्रमकता ही या अस्थिरतेला अधिक अस्वस्थ करत आहे. ट्रम्प यांनी काही वादांमध्ये त्यांचे आवडते व प्रभावी ‘व्यापार निर्बंधां’चे हत्यार उगारून जरी त्या झगडणाऱ्यांना युद्धविरामासाठी मजबूर केले असले तरी हा केवळ स्वल्पविराम आहे, ज्याचा टिकाव परिस्थितीवर अवलंबून असणार आहे. आजची जागतिक असंवेदनशीलता, असहिष्णुता लक्षात घेता एका विकृताचे अविवेकी पाऊल या संपूर्ण मानवजातीला युद्धाच्या वणव्यात ढकलू शकते. ही भीती आज ना उद्या प्रत्यक्ष अवतरण्याची शक्यता मोठी आहे.
पर्याप्त प्रमाणात संसाधनं नसतील तर प्रगतीला खीळ बसू शकते, आपल्या वर्चस्वाला धक्का लागू शकतो आणि याउलट जर आपल्याकडे संसाधनांचा अमर्याद साठा असेल तर आपण जगावर श्रेष्ठत्व गाजवू शकतो, याची जाणीव जगातील मोठ्या राष्ट्रांना आहे. यासाठीच संसाधनसंपन्न प्रदेश, महत्त्वाचे व्यापारमार्ग, श्रीमंत बाजारपेठा, कच्च्या मालाची केंद्रे वगैरेंवर ताबा मिळविण्यासाठी आजची सर्व आक्रमकता आणि आक्रमणे होताना दिसत आहे. लोकसंख्येवर नियंत्रण, संसाधनांचा कार्यक्षम वापर, हरित व अक्षय ऊर्जेच्या निर्मितीत व वापरात वाढ, पुनर्वापर – दुरुस्तीला प्राधान्य देणारी जीवनपद्धती स्वीकारली तर संसाधनांसाठी युद्ध करण्याची वेळच येणार नाही. पण आता यावर विचारमंथन करून काही फायदा होईल असे वाटत नाही. कारण परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. प्रत्येक देश आज युद्धाच्या तयारीला लागला आहे. युद्धात आपल्या बाजूने इतरांनी उभे राहावे याकरिता परराष्ट्रांशी हितसंबंध घट्ट करण्यासाठी सर्वत्र राजकीय मुत्सद्देगिरी जोमात सुरू आहे. राष्ट्रवादाचा नरेटिव्ह तयार करून युद्धासाठीचे समर्थन देशवासीयांकडून मिळविले जात आहे. संभाव्य युद्धाचा अंदाज घेऊन रणनीती, राजनीती, आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन होत आहे, परंतु युद्ध होऊच नये यासाठी तशी परिस्थिती, तसे संवाद वा व्यवहार होतानाचे प्रामाणिक प्रयत्न मात्र दिसत नाहीत. ’विनाशकाले विपरीत बुद्धी’ म्हणतात ते बहुदा यालाच.