
माथाडी सेनेचे तालुका अध्यक्ष अशोक धोडी यांच्या खुनाच्या प्रकरणात डहाणू न्यायालयाने अविनाश धोडी, मनोज रजपूत आणि आशीष धोडी-पटेल या तीन मुख्य आरोपींविरुद्ध थेट गुन्हेगारी वॉरंट जारी केले आहे. सहा महिने झाले तरीही आरोपी फरार असल्याने कोर्टाच्या वॉरंटनंतर तरी पोलीस आरोपींना पकडणार का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
मिंधे गटाचे पदाधिकारी अशोक धोडी हे कामानिमित्त डहाणू येथे कार ठेवून ट्रेनने मुंबईला गेले होते. 20 जानेवारी रोजी सोमवारी संध्याकाळी डहाणू रेल्वे स्थानकात उतरून बोर्डी-बोरीगावमार्गे वेवजी येथे घरी येण्यासाठी निघाले. मात्र ते घरी पोहोचलेच नाहीत. तेव्हापासून अशोक धोडी आणि त्यांची कार बेपत्ता होती. पोलिसांनी आठ दिवसांनंतर अपहरणाचा गुन्हा नोंद केला. दरम्यान 31 जानेवारीला गुजरातमधील सरीगाम येथील बंद खाणीत गाडीच्या डिकीत धोडी यांचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला. यानंतर तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी चार आरोपींना अटक केली. तर या प्रकरणातील मुख्य आरोपी अविनाश धोडी वेवजी येथील पोलीस चौकीतून फरार झाला होता. त्याच्यासह मनोज राजपूत आणि आशीष धोडी-पटेल हे आरोपी अजूनही फरार आहेत.
सहा महिने उलटून गेले तरी अद्याप मुख्य आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे 29 मे रोजी झालेल्या सुनावणीत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. एन. पोळे यांनी वॉरंट जारी करत आरोपींना 21 जून रोजी न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी थेट गुन्हेगारी वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे पोलीस राजकीय दबाव झुगारून या वॉरंटची अंमलबजावणी करून आरोपींना बेड्या ठोकणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.