…तर हिंदुस्थानशी युद्ध अटळ; असीम मुनीरनंतर बिलावल भुट्टोची धमकी

पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी काही दिवसांपूर्वी हिंदुस्थानला युद्धाचा इशारा दिला होता. बुडण्याची वेळ आली तर अर्ध्या जगाला घेऊन बुडणार, असे विधान मुनीर यांनी अमेरिकेतून केले होते. त्यानंतर आता पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि पाकिस्तान पीपुल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो जरदारी यांनी हिंदुस्थान विरोधात गरळ ओकली आहे. हिंदुस्थानने सिंधू करार स्थगित ठेवला आणि सिंधू नदीवर डॅम उभारण्याचा प्रयत्न केला तर युद्ध अटळ आहे, अशी फडफड बिलावल भुट्टो यांनी केली.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानची चौफेर कोंडी केली होती. हिंदुस्थानने सिंधू जल कराराला स्थगिती दिली होती. त्यामुळे पाकिस्तानचा चांगलाच तिळपापड झाला. याच संदर्भात बोलताना बिलावर भुट्टो यांनी हिंदुस्थानला युद्धाची धमकी दिली.

हिंदुस्थाने सिंधू करार स्थगितच ठेवला आणि नदीवर डॅम बांधण्याची तयारी सुरू केली तर युद्ध अटळ आहे. पाकिस्तानने अद्याप युद्धाला सुरुवात केलेली नाही. आम्हाला शांतता हवी आहे. पण हिंदुस्थानने कुरापत काढली तर त्याला पाकिस्तानचा प्रत्येक नागरिक आणि सैन्य उत्तर द्यायला तयार आहे, अशी धमकी बिलावल भुट्टाने दिली.

बुडण्याची वेळ आली तर अर्ध्या जगाला घेऊन बुडणार! अमेरिकेतून असीम मुनीरची हिंदुस्थानला अणुयुद्धाची धमकी