20 दिवसांनंतर पाकिस्तानच्या ताब्यातील बीएसएफ जवानाची झाली सुटका

हिंदुस्थानच्या कारवाईपुढे पाकिस्तानने अखेर नरमाईचे धोरण स्वीकारले आहे. चुकून पाकिस्तानच्या सीमेमध्ये गेलेल्या पूर्णम साहू यांना पाकिस्तानने परत पाठवले आहे. 20 दिवसांहून अधिक काळ पाकिस्तानच्या ताब्यात राहिल्यानंतर, पूर्णम साहू अटारी सीमेवरून हिंदुस्थानमध्ये परतले आहेत. बीएसएफने एका निवेदनात म्हटले आहे की, 23 एप्रिल 2025 पासून पाकिस्तान रेंजर्सच्या ताब्यात असलेले बीएसएफ जवान पूर्णम कुमार साहू यांना सकाळी 10.30 वाजता अमृतसरमधील संयुक्त चेक पोस्ट अटारी येथून हिंदुस्थानच्या स्वाधीन करण्यात आले. हे हस्तांतरण शांततेत आणि स्थापित प्रोटोकॉलनुसार पार पडले.”

40 वर्षीय पूर्णम साहू यांनी 23 एप्रिल रोजी चुकून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली होती आणि नंतर त्यांना पाकिस्तान रेंजर्सनी ताब्यात घेतले. पंजाबच्या फिरोजपूर सेक्टरमध्ये बीएसएफच्या 182 व्या बटालियनमध्ये तैनात पूर्णम साहू हे गणवेशात होते आणि त्यांच्याकडे त्यांची सर्व्हिस रायफल होती. बीएसएफ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, साहू सीमेजवळ शेतकऱ्यांच्या एका गटाचे रक्षण करण्यासाठी त्यांच्यासोबत जात असताना ही घटना घडली. ते एका झाडाखाली विश्रांती घेण्यासाठी गेले आणि चुकून पाकिस्तानी हद्दीत घुसले. त्यांना ताबडतोब पाकिस्तान रेंजर्सनी ताब्यात घेतले.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या एक दिवसानंतर पाकिस्तानने त्यांना ताब्यात घेतले होते. पाकिस्तानच्या दहशतवादाला प्रत्युत्तर देण्यासाठी, हिंदुस्थानने ऑपरेशन सिंदूर सुरू केले होते. पूर्णम साहूचे कुटुंब यादरम्यान त्यांची परत येण्याची वाट बघत होते. सीमेवर असलेल्या बीएसएफ जवान साहूला ताब्यात देण्यासाठी पाकिस्तानी रेंजर्स स्वतः आले. सूत्रांच्या माहितीनुसार, ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान हिंदुस्थानच्या दबावापुढे झुकला.

पूर्णम साहू यांचे कुटुंब पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील ऋषरा येथे राहते आणि त्यांना ताब्यात घेतल्यापासून ते चिंताग्रस्त आणि अस्वस्थ होते. त्यांचा सात वर्षांचा मुलगा, परिस्थितीच्या गांभीर्याची जाणीव नसताना, त्याचे वडील कधी परत येतील हे विचारत होता. आता ते सुखरुप परतल्यानंतर कुटुंबाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.