‘ते‘सर्व प्रवासी फुटबोर्डवर उभे होते! मध्य रेल्वेने मृत, जखमी प्रवाशांवरच फोडले खापर

दिवा-मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान झालेल्या अपघातानंतर मध्य रेल्वेची असंवेदनशीलता दिसून आली. लोकलमधून जे प्रवासी खाली पडले, ते लोकलच्या फुटबोर्डवर उभे होते, असे विधान करून मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी अपघाताचे खापर मृत व जखमी प्रवाशांवरच फोडले. मध्य रेल्वेच्या या भूमिकेविरुद्ध प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

लोकलमधून प्रवासी पडल्याची घटना घडून बराच वेळ उलटल्यानंतर मध्य रेल्वेने पत्रकार परिषद घेतली. त्यांनी अपघाताचे खापर प्रवाशांवर फोडून रेल्वे प्रशासनाचे अपयश झाकण्याचा प्रयत्न केला. जे प्रवासी पडले, ते लोकलच्या दारात उभे राहून प्रवास करत होते. धोकादायक वळणावर दोन लोकल जवळून जात असताना फुटबोर्डवरील प्रवासी एकमेकांना घासले गेले. त्यांच्या बॅगा एकमेकांमध्ये अडकून ते खाली कोसळले, असा दावा स्वप्नील नीला यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यांच्या दाव्यावर प्रवाशांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या. मध्य रेल्वेच्या असंवेदनशील कारभाराचा अनेक प्रवाशांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून निषेध केला.

प्रवासी संघटनांची मध्य रेल्वेवर धडक

सोमवारी सकाळी झालेल्या अपघाताने प्रवासी सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. मध्य रेल्वेवरील प्रवाशांच्या अनेक समस्यांचे घोंगडे कित्येक वर्षे भिजत पडले आहे. प्रवासी संघटनांनी वेळोवेळी विविध मागण्यांबाबत निवेदने दिली. मात्र त्या मागण्यांबाबत रेल्वे प्रशासनाने गांभीर्य दाखवलेले नाही. प्रशासनाची हीच अनास्था प्रवाशांच्या जिवावर बेतत आहे याकडे लक्ष वेधण्यासाठी प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक प्रतीक गोस्वामी यांची भेट घेतली. लोकलच्या गर्दीचा ताण कमी करण्यासाठी ठाण्यावरून शटल सुरू करा, रेल्वेने काम हाती घेतलेले विविध प्रकल्प वेळीच पूर्ण करा, ‘पीक अवर्स’ला लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवा आदी मागण्या प्रवासी संघटनांनी केल्या आहेत. याबाबत लवकरच कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन गोस्वामी यांनी दिले. प्रवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये लता अरगडे, नंदकुमार देशमुख, राजेश घनघाव, नीला भागवत, सायली शिंदे, पैलाश वर्मा यांचा समावेश होता.