थांबा, भटक्या कुत्र्यांच्या प्रकरणात मी लक्ष घालतो; सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आश्वासन

दिल्लीच्या रस्त्यांवरून भटक्या कुत्र्यांना हटवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतल्यानंतर देशभरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात आता मी स्वतः लक्ष घालतो, अशी हमी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर आक्षेप घेत एका वकिलाने हे सर्व प्रकरण सरन्यायाधीशांसमोर मांडल्यानंतर गवई यांनी ही हमी दिली आहे. ही बाब भटक्या कुत्र्यांशी संबंधित असून याआधीही सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय आहे, ज्यामध्ये स्पष्टपणे म्हटले की, कुत्र्यांना अशा प्रकारे हलवता येणार नाही. त्या निर्णयात न्यायाधीश करोल हेसुद्धा सहभागी होते. त्या निर्णयामध्ये सर्व जिवांसाठी करुणा असली पाहिजे असेही नमूद आहे, असे या वकिलाने सरन्यायाधीश गवई यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

वकिलाचे सर्व म्हणणे ऐकूण घेतल्यानंतर सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले की, पण या प्रकरणात दुसऱ्या खंडपीठाने आधीच आदेश दिले आहेत. मी स्वतः यामध्ये लक्ष घालेन.  न्यायाधीश जे. बी. पारडीवाला आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने 11 ऑगस्ट रोजी दिल्ली सरकार, दिल्ली महापालिका यांना दिल्लीतून भटक्या कुत्र्यांना हटवून प्राण्यांच्या आश्रयस्थानात हटवण्याचे आदेश दिले होते. कोर्टाच्या या निर्णयानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दिल्लीतील असुरक्षित भागातील भटक्या कुत्र्यांना उचलण्यास सुरुवात करावी. सर्व परिसरांना भटक्या कुत्र्यांपासून मुक्त करण्यासाठी हा महत्त्वाचा उपक्रम असावा, यात कोणतीही तडजोड करू नये, असे खंडपीठाने आपल्या आदेशात म्हटले होते. जर कोणतीही व्यक्ती किंवा प्राणी संघटना यामध्ये अडथळा निर्माण करत असेल, तर न्यायालय त्यांच्याविरुद्ध न्यायालयाचा अवमान केला आहे असे गृहीत धरून कठोर कारवाई केली जाईल, असेही कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले होते.

सर्वोच्च न्यायालयाबाहेर वकील आणि कुत्रा प्रेमींमध्ये हाणामारी झाल्याचा  व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत एक वकील कुत्रा प्रेमीला दोनवेळा कानशिलात मारताना दिसत आहे. तर आजुबाजूचे लोक या भांडणामध्ये पडून भांडण सोडवताना दिसत आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.