इंटरनेट सामाजिक भेदभावाचे नवे माध्यम, सरन्यायाधीशांनी व्यक्त केली चिंता

“माहिती तंत्रज्ञानाच्या युगात, इंटरनेट समाजात फूट पाडत आहे”, अशी चिंता देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी वक्तव्य केली आहे. केंब्रिज विद्यापीठात ‘न्यायाची उपलब्धता सुधारण्यात तंत्रज्ञानाची भूमिका’ या विषयावर भाष्य करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

यावेळी बोलताना सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले की, “इंटरनेट कनेक्टिव्हिटी, उपकरणे आणि डिजिटल साक्षरतेच्या असमान प्रवेशामुळे उपेक्षित समुदायांना न्यायापासून वंचित राहावे लागत आहे. यामुळे सामाजिक अंतर वाढत असून, तंत्रज्ञान हे समावेशकतेचे साधन असले तरी ते नव्या प्रकारच्या भेदभावाचे कारण ठरत आहे”, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले आहेत की, “तंत्रज्ञानाने न्यायप्रणालीला गती दिली असली तरी त्याचा वापर सर्वसमावेशक असणे आवश्यक आहे. तंत्रज्ञान हे न्यायाच्या कार्याला पूरक ठरले पाहिजे, त्याची जागा घेऊ नये. विशेषत: वैयक्तिक प्रकरणांचे मूल्यमापन आणि तर्काधारित निर्णयप्रक्रिया यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग केला पाहिजे,” असं मत त्यांनी व्यक्त केलं.