मणिपूरला जाण्यासाठी काँग्रेसने पंतप्रधान मोदींचे बुक केलेलं तिकीट एअर इंडियाने केले रद्द, पवन खेरा यांचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अद्याप हिंसाचारग्रस्त मणिपूरचा दौरा केलेला नाही. यावरून काँग्रेस सातत्याने टीका करत आहे. मात्र आता काँग्रेसने पंतप्रधान मोदींसाठी आसाममधील सिलचर ते मणिपूरमधील इम्फाळ अशा प्रवासाचे विमानाचे थेट तिकीटच बुक केले. मात्र एअर इंडियाने हे तिकीट रद्द करण्यात आले, असा दावा काँग्रेस नेते पवन खेरा यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या आसामच्या दौऱ्यावर असून, तेथून मणिपूर अत्यंत जवळ आहे. पंतप्रधानांनी मणिपूरला जाऊन तेथील जनतेची भेट घ्यावी, या उद्देशाने काँग्रेसने त्यांच्यासाठी एअर इंडियाच्या ‘AI 749’ या विमानाचे तिकीट बुक केले होते. हे विमान सकाळी १०:४५ वाजता सिलचरवरून सुटणार होते. मात्र, तिकीट बुक केल्यानंतर काही वेळातच एअर इंडियाकडून ते रद्द करण्यात आल्याचा संदेश प्राप्त झाल्याचे पवन खेरा यांनी सांगितले.

पवन खेरा यांनी या संदर्भात X वर एक पोस्ट शेअर करत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. “पंतप्रधान मोदी जगभर फिरतात, परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून हिंसाचाराने होरपळणाऱ्या मणिपूरला जाण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. ते आसाममध्ये असूनही शेजारच्या राज्यात जात नाहीत, म्हणूनच आम्ही त्यांच्यासाठी हे तिकीट बुक केले होते,” असे खेरा यांनी म्हटले आहे.