
गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त जिह्याचे पालकमंत्री स्वीकारण्यास सहसा कुणी तयार होत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणा भीमदेवी थाटात ते आव्हान स्वीकारले. पण जिह्याचा पालकमंत्री बनल्यानंतर गडचिरोलीकरांना फडणवीस यांचे दर्शन दुर्मिळ झाले आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी फडणवीसांनी गडचिरोलीत यावे यासाठी काँग्रेस महायज्ञ करणार आहे.
गडचिरोलीतील लोकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत असूनही सरकारचे त्याकडे लक्ष नाही. रानटी हत्तींच्या धुमाकुळामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. अवकाळीमुळे त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जंगली प्राणी मानवी वस्त्यांमध्ये घुसू लागल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दहशत आहे. रस्ते आणि महामार्गाची दुरवस्था, अपुऱ्या आरोग्य सुविधांनीही लोक त्रस्त आहेत.
पालकमंत्री या नात्याने फडणवीसांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असतानाही पावले उचलली जात नसल्याने गडचिरोलीतील जनता नाराज आहे. निवेदने, आंदोलने, मागण्या करूनही महायुती सरकार आणि पालकमंत्री फडणवीस यांना दया येत नसल्याने 6 जून रोजी सेमाना देवस्थानात काँग्रेसने महायज्ञाचे आयोजन केले आहे. यावेळी देवाभाऊंना गडचिरोलीत आणा असे साकडे देवाला घातले जाणार आहे. सोशल मीडियावर काँग्रेसच्या या आगळ्यावेगळ्या आंदोलनाची जोरदार चर्चा आहे.