
पालकमंत्र्यांवाचून काही अडलं नाही, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन सगळं करतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अजित पवार आणि शिंदे गटाला मदतनीसाच्या भूमिकेतच राहावे लागणार असून त्यांच्या पालकमंत्रीपदाच्या आशा मावळल्या आहेत.
कुंभमेळा नियोजनाच्या बैठकीनंतर रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पत्रकारांशी बोलत होते. कुंभमेळ्याचे नियोजन व्यवस्थित सुरू आहे. पालकमंत्री नसल्याने काहीही अडलं नाही, काळजी करण्याचे कारण नाही, गिरीश महाजन हे कुंभमेळा मंत्री आहेत, ते सगळं करतील. जिह्यातील इतरही मंत्री आहेत. त्यानंतरही काही कमी पडले तर आम्ही आहोतच, असे त्यांनी स्पष्ट केले. जिह्याचा कारभार असो की कुंभमेळा, कमांड भाजपचीच राहील. अजित पवार, एकनाथ शिंदे गटाच्या मंत्री, आमदारांना मदतनीसाची भूमिका बजावावी लागेल हेच यावरून स्पष्ट होते. या दोन्ही गटांच्या पालकमंत्रीपदाच्या अपेक्षा मात्र यामुळे मावळल्या आहेत.
सहा हजार कोटींची कामे होणार
कुंभमेळ्याच्या निमित्ताने सोयीसुविधा व विकासकामांसाठी चार हजार कोटींच्या निविदा प्रक्रिया सुरू आहेत. आणखी दोन हजार कोटींची कामे केली जाणार आहेत. त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थाच्या छोट्या जागेचा विचार करून स्नानासाठी गोदातीरी पर्यायी व्यवस्था करण्यावर एकमत झाले आहे. त्र्यंबकेश्वर, नाशिकच्या सर्व 13 प्रमुख आखाड्यांच्या साधू-महंतांशी चर्चा झाली, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले, नियोजनाबाबत त्यांना माहिती दिली. त्यांच्या मागण्या मान्य करण्यात येतील. गोदावरी प्रवाहित राहावी यासाठी गिरीश महाजन यांनी केलेले नियोजन मान्य करण्यात येईल. कुंभमेळा काळात गोदावरी स्वच्छ राहावी यासाठी नाल्याचे, गटारीचे कुठलेही पाणी नदीत मिसळणार नाही यासाठी उपाययोजना केल्या जातील. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन चेंगराचेंगरी होऊ नये यासाठी नियोजन केले जाणार आहे, असेही फडणवीस म्हणाले.