धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद गेलं, पण बंगला सुटेना, 46 लाख रुपये भाडं वसूल करा – अंजली दमानिया

अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद जाऊन 5 महिने उलटून गेले आहेत तरी, त्यांनी अद्याप सातपुडा हा शासकिय बंगला रिकामा केला नाही. यावरूनच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. धनंजय मुंडे यांनी शासकिय बंगला तब्बल पाच महिने खाली केला नाही. हा बंगला 4667 चौ फुटाचा बंगला आहे, म्हणजे याच्या दंडाची रक्कम ही महिन्याला 200 रुपये चौ फुटाप्रमाणे, तब्बल पाच महिन्याची म्हणून 46 लाख रुपये इतकी आजरोजी आहे. या दंडाचा पैसांपैसा वसूल केला गेला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

X वर एक पोस्ट करत अंजली दमानिया म्हणाल्या आहेत की, “धनंजय मुंडे यांनी मंत्रीपद सोडलं, पण पुन्हा मंत्री म्हणून येण्याची हाव सुटत नाही. 4 मार्चला त्यांच्याकडून पदाचा राजीनामा घेतला गेला, आज 4 ऑगस्ट आहे. तब्बल 5 महिने उलटून गेले. याआधी ऑफिसच्या बाहेरची पाटी काढली नाही. ते प्रकरण लावून धरलं म्हणून पाटी काढली, आणि आता हे. आता शासकिय बंगला तब्बल 5 महिने खाली केला नाही. त्यांचं म्हणणं असे आहे की, आजारपणामुळे आणि मुलीच्या शाळेमुळे मुंबईत रहावं लागत आहे. जरूर रहा, पण माझ्या आणि सामान्य लोकांच्या कराच्या पैशांनी नाही. तो बंगाला हा शासकीय कामासाठी दिला जातो.”

त्या म्हणाल्या की, “जर तुम्ही स्वाभिमानी असतात तर फुकटचं घर घेऊन राहिला नसतात. एक 2 बीएचके विकत नाहीतर, भाड्यावर घेऊन राहिला असतात. खोटी कारणं दिली नसती. हा बंगला 4667 चौ फुटाचा बंगला आहे, म्हणजे याच्या दंडाची रक्कम ही महिन्याला 200 रुपये चौ फुटाप्रमाणे, तब्बल पाच महिन्याची म्हणून ४६ लाख रुपये इतकी आजरोजी आहे. ह्या दंडाचा पैसांपैसा वसूल केला गेला पाहिजे. मुख्यमंत्र्यांना हा दंड माफ करण्याचे अधिकार असतात, पण त्यांनी 1 रुपया देखील करता कामा नये.”