
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात गतवर्षी पावसाळा संपता संपता कोसळलेली संरक्षक भिंत आणि मातीचा भराव गेले दोन दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसात वाहून पायथ्याशी वसलेल्या पेढे गावातील शेतीत शिरला आहे. या भागातील शेतीसह सर्वत्र चिखल साचला असून पाणकरवाडीतील विहीर आणि रेल्वे ट्रकवरील मोरीही गाळाने भरली आहे. गावकऱ्यांसह महसूल कर्मचारी, राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. सोमवारी पडलेल्या जास्तीच्या पावसाने मातीचा भराव घाटातील दरीतून वाहून थेट पायथ्याशी वसलेल्या पेढे-पाणकरवाडीतील शेतात गेला. तेथील एक विहीरही गाळाने भरली आहे. शिवाय कोकण रेल्वेच्या ट्रकवरील मोरी या गाळाने काठोकाठ भरली आहे. तर दुसरीकडे वाहून आलेला गाळ हा तेथील शेतीत गेल्याने दहा ते पंधरा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे.