सिक्कीममध्ये अडकले महाराष्ट्रातील 40 पर्यटक, सुरक्षा यंत्रणांच्या तत्परतेने सुरक्षित सुटका

ईशान्य हिंदुस्थानात सुरू असलेला मुसळधार पाऊस, पुराचा कहर आणि भूस्खलनाच्या घटनांचा महाराष्ट्रातील पर्यटकांनाही फटका बसला. सिक्कीममध्ये झालेल्या भूस्खलनामुळे महाराष्ट्रातील 40 पर्यटक अडकले होते. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर उत्तर सिक्कीम ते गंगटोक रस्ता खुला झाला आणि सुरक्षा यंत्रणांनी तत्परता दाखवून पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी हलवले.

मान्सूनने गेल्या काही दिवसांत ईशान्य हिंदुस्थानात थैमान घातले आहे. आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि सिक्कीममधील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. त्यात स्थानिक नागरिकांबरोबर पर्यटकांचे हाल झाले आहेत. महाराष्ट्रातील 40 पर्यटक सिक्कीमच्या लाचुंग परिसरात घडलेल्या भूस्खलनाच्या घटनेमुळे अडकले होते. मुसळधार पाऊस आणि तिस्ता नदीला आलेल्या पुरामुळे त्यांचा जीव टांगणीला लागला होता. त्यांना वाचवण्यासाठी स्थानिक प्रशासन व सुरक्षा यंत्रणांनी शर्थीचे प्रयत्न केले.

याचदरम्यान महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्तांनी सिक्कीम प्रशासनाला संपर्क केला होता. त्यानुसार बचाव मोहीम हाती घेण्यात आली होती. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर उत्तर सिक्कीम ते गंगाटोकपर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला. त्यानंतर अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षितरित्या बाहेर काढून पुढील प्रवासासाठी मार्गस्थ करण्यात आले. सिक्कीमच्या राज्य आपत्कालीन केंद्रातून ही माहिती देण्यात आली.