
खवळलेला समुद्र, खराब हवामानामुळे विविध बंदरांत धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा बावटा लावण्यात आला आहे. त्यामुळे शनिवारी दुपारपासून गेट वे-एलिफंटा, गेट वे-जेएनपीए, मोरा-भाऊचा धक्का, करंजा-रेवस या मार्गावरील सागरी प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे. बोटी बंद असल्याने प्रवासी व कामगारांना रेल्वे, एसटी, बस, खासगी वाहनाने कामाचे ठिकाण गाठण्याची वेळ आली आहे. तसेच मासेमारी बोटही बंदरात माघारी परतल्याने मासेमारीही ठप्प झाली आहे. दोन महिन्यात सहाव्यांदा लाँच सेवा कोलमडल्याने संताप व्यक्त होत आहे.
खराब हवामान आणि मुसळधार पावसाचा फटका सागरी प्रवासी वाहतुकीला बसला आहे. त्यातच बंदरात धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा बावटा शनिवारी विविध बंदरांत लावण्यात आला. त्यामुळे खबरदारी म्हणून गेट वे ऑफ इंडिया-एलिफंटा, गेट वे-जेएनपीए दरम्यानची सागरी प्रवासी वाहतूक सलग सहा दिवस बंद करण्यात आली असल्याची माहिती गेट वे मुंबई जलवाहतूक संस्थेचे सेक्रेटरी इक्बाल मुकादम यांनी दिली. धोक्याच्या इशाऱ्यानंतर या सागरी मार्गावरील प्रवासी, पर्यटक वाहतूक पूर्णपणे कोलमडून गेली आहे. विविध सागरी मार्गांवरील पर्यटक, प्रवासी सेवा खंडित झाल्याने या सागरी मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवासी, पर्यटकांची गैरसोय होत आहे.
खवळलेल्या समुद्रात जाऊ नका!
खराब हवामानामुळे स्थानिक मासेमारीवरही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक मासळी बाजारात मासळीचा तुटवडा निर्माण झाला आहे. दरम्यान ताशी ५०-६० किमी वाऱ्यासह समुद्रात खवळलेली स्थिती राहणार असून मच्छीमारांनी या कालावधीत समुद्रात जाऊ नये, असे आवाहन मोरा बंदर विभागाकडून करण्यात आले आहे. हजारो प्रवासी व पर्यटकांना धोक्याचा इशारा देणारा लाल बावटा उतरून सागरी मार्ग पूर्ववत सुरू होण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.