
शेतकरी कर्जमाफी जाहीर करण्याची आज गरज असताना भाजप युती सरकार जाणूनबूजून टाळाटाळ करत आहे. निवडणुकीवेळी कर्जमाफीचे आश्वासन देऊन मते घेतली व सत्ता मिळवली आणि आता कर्जमाफीबद्दल आम्ही बोललोच नाही, असे सत्ताधारी निर्लज्जपणे सांगत आहेत. शेतकरी कर्जमाफी व लाडक्या बहिणीला 2100 रुपये द्या आणि जमत नसेल तर खुर्च्या खाली करा, असा इशारा काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.
भाजप युती सरकार हे फक्त अदानी-अंबानीसाठी पायघड्या घालते, पण शेतकरी व राज्यातील भगिनींना पैसे देताना चालढकल करत आहे. सूरजागडच्या खदानीमधून मलई खाणार, समृद्धी महामार्गात भ्रष्टाचार, घोडबंदर-भाईंदर बोगदा प्रकल्पात भ्रष्टाचार, पुणे रिंग रोड आणि आता अदानीच्या हितासाठी शक्तिपीठच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा मलिदा खाण्याचा उद्योग फडणवीस, अजित पवार व एकनाथ शिंदे यांचा सुरू आहे. सत्तेतून मलाई खाता आणि शेतकरी व भगिनींना देण्यासाठी पैसे कसे नाहीत, असा सवाल सपकाळ यांनी केला आहे.
दिल्लीत जाऊन निधी आणा
राज्य सरकारची तिजोरी रिकामी असेल तर दिल्लीत जाऊन मोदी-शहांकडून राज्यासाठी भरीव निधी आणा, तेवढी तरी हिम्मत दाखवा. समितीचा खेळ करू नका व तातडीने शेतकरी कर्जमाफी व लाडक्या बहिणीला 2100 रुपये द्या, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.