विरोधकांना बोलू दिलं नाही तर संसद चालवण्यात अर्थ काय? अकाली दलच्या खासदार हरसिमरत कौर यांचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात विरोधकांकडून अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या हालचाली सुरू असताना शिरोमणी अकाली दलच्या खासदार हरसिमरत कौर बादल यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, “मी त्या विरोधकांचा भाग नाही,” मात्र संसदेत विरोधकांना बोलू दिले जात नसल्याबद्दल त्यांनी सरकार आणि अध्यक्षांवर टीका केली.

हरसिमरत कौर बादल म्हणाल्या, “गेल्या 18 वर्षांत मी या सभागृहाला आजच्या पद्धतीने चालताना पाहिले नाही. मी सरकार आणि अध्यक्षांना विनंती करते की, येथे बसलेले खासदार जनतेने निवडून पाठवले आहेत. पण त्यांनाच बोलू दिले नाही, तर संसद चालवण्यासाठी जनतेचा पैसा का खर्च केला जात आहे?”

त्या पुढे म्हणाल्या की, “संपूर्ण विरोधकांचा आवाज कसा दाबू शकता? हिंदुस्थान-अमेरिका व्यापार कराराबाबत देशाची दिशाभूल करण्यात आली आहे. देशातील शेतकऱ्यांचे नुकसान करून देश प्रगती करू शकत नाही.”

सरकारला आवाहन करत त्या म्हणाल्या, “विरोधकांना बोलू द्या. जर विरोधकांनाच बोलू दिले जाणार नसेल, तर ही संसद उभारण्याचा अर्थ काय?”