ठाणे महापालिकेच्या तत्कालीन सह आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या फेरीवाल्याला 7 वर्षांची शिक्षा

ठाणे महापालिकेच्या तत्कालीन सह आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर अतिक्रमण हटवत असताना कोविड काळामध्ये जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपी अमरजीत सिंह यादव या फेरीवाऱ्याला शुक्रवारी 307 च्या गुन्ह्यात दोषी ठरवत 7 वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणल्याबद्दल व सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याबद्दल अमरजीत याला न्यायालयाने त्याला 3 वर्षाची व दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्याप्रमाणे कलम 237 नुसार 2 वर्षाची शिक्षा व दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच मुंबई कायदा कलम 37/1/3 नुसार आरोपीला दोषी धरत 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. ही सगळी शिक्षा सक्त मजुरीची आहे.

या खटल्यात सरकारी वकील म्हणून अॅड. शिशिर हिरे यांनी काम पाहिले. तसेच सुनावणीवेळी खटल्यात एकूण 21 साक्षीदार तपासण्यात आले होते. तपासाअंती अमरजीत सिंग यादव याने केलेला हल्ला हा जीवघेणा होता हे सरकारी वकिल शिशिर हिरे यांनी न्यायालयात सिद्ध केले.

अॅड. शिशिर हिरे

काय आहे प्रकरण?

घोडबंदर रोड येथील कासारवडवली परिसरात कल्पिता पिंपळे आणि त्यांचे अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर अमरजितसिंह यादव या माथेफिरू फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला केला होता. यामध्ये पिंपळे यांची दोन व पालवे यांचे एक बोट तुटले होते.

भावासारखा भक्कमपणे मागे उभा, उद्धव ठाकरे यांनी दिलेला विश्वास

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घटनेच्या दिवशी कल्पिता पिंपळे यांना फोन करून त्यांच्या मागे भावासारखा भक्कमपणे उभा असल्याचा विश्वास दिला होता. अशा मुजोर परप्रांतीय फेरीवाल्यांना धडा शिकवणार असा इशारा देखील उद्धव ठाकरे यांनी दिला होता. ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी अशा घटनेने खचून जाऊ नये, जोमाने काम करावे आम्ही पाठीशी उभे आहेत असा विश्वास देखील उद्धव ठाकरे यांनी पालिका अधिकाऱ्यांना त्यावेळी दिला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी स्वतः लक्ष घालून अॅड. शिशिर हिरे यांची या प्रकरणात सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती. दरम्यान, कल्पिता पिंपळे या सध्या मिरा भाईंदर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी कार्यरत आहेत.