
‘लाडकी बहीण योजने’चा आर्थिक भार सरकारवर मोठ्या प्रमाणात पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी रखडल्याचा धक्कादायक खुलासा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केला आहे. ‘लाडकी बहीण योजने’तून दर महिन्याला 2100 रुपयांची आर्थिक मदत केली जाईल. तसेच शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुती सरकारने दिले होते. राज्यात सरकार स्थापन होऊन सहा महिने झाले आहेत, पण अद्यापही या आश्वासनांची पूर्तता करण्यात आलेली नाही. दरम्यान ‘लाडकी बहीण योजने’मुळे राज्य सरकारवर मोठा भार आहे. यामुळे शेतकरी कर्जमाफीचा निर्णय अद्याप घेता आलेला नाही, असे वक्तव्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.
सरकार शेतकरी कर्जमाफीसाठी वेळकाढूपणा करतंय असं म्हणण्यापेक्षा सध्या सरकारवर फायनान्शिअल बर्डन आहे. सर्वच घटकातील लोकांना न्याय द्यायचा आहे. यासाठी उशीर लागतो. उशीर लागतोय म्हणून याला वेळकाढूपणा म्हणणे योग्य नाही, अशी पुष्टीही आबिटकर यांनी पुढे जोडली.
कर्जमाफीचे आश्वासन दिलेच नव्हते
शेतकरी कर्जमाफीची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. निवडणूक जाहीरनाम्यात दिलेले आश्वासन पाळावे अशी मागणी होत आहे. भाजप नेते आणि मंत्री अतुल सावे यांनी शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन जाहीरनाम्यात दिलेच नव्हते, असे म्हणत घुमजाव केले आहे.