
रत्नागिरी जिह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. जिह्यातील खेड, मंडणगड, चिपळूण, लांजा तालुक्यात शनिवारपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने जोरदार पुनरागमन करीत जिह्याला अक्षरशः झोडपून काढले.
शनिवारी रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे खेड-दापोली मार्गावरील सुर्वे इंजिनीअरिंगजवळ पाणी साचले.साखरोली पुलावरून पाणी गेले, तर सुसेरी पुलावरून पाणी गेले, तर ठिकठिकाणी झाडे कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. साखरोली पुलावरून प्रथमच पाणी गेले, तर फुरूसजवळ पुलाचे काम सुरू असल्याने तयार करण्यात आलेल्या पर्यायी मार्गावरून पाणी गेल्याने येथील मार्ग बंद झाला होता.
धामणी गावात ढगफुटीसदृश पाऊस
मंडणगड मार्गावर धामणी गावात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने तेथील ओढय़ाबाहेर पाणी येऊन जवळील घरांना लागल्याने घरांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे, तर झाडे वाहून गेली आहेत. फुरूस-दयाळ मार्गावर झाड पडल्याने तेथील वाहतूक काही तास ठप्प झाली होती.