
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कधी कडकडीत ऊन तर कधी धुवाधार पाऊस अशी परिस्थिती दिसून येत आहे. अनेक तलावही पुर्णपणे भरल्याने ओसंडून वाहत आहेत. राधानगरी, काळम्मावाडी, तुळशी आदी लहान मोठ्या धरण प्रकल्पांतून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गेल्या 24 तासात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत चार ते पाच फुटांची वाढ झाली आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास 29 फुट 3 इंच झाली होती. तर 19 बंधारे अजूनही पाण्याखाली असल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू होती.
दरम्यान, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील विविध भागात पावसाचा जोर कायम असल्याने कृष्णा नदीच्या पाणीपातळीतही वाढ झाली असून पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या संगमावरील शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी येथील श्रीदत्त मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत नदीचे पाणी शिरले. त्यामुळे आज पहाटे मंदिरात दक्षिण द्वार सोहळा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ऊन-पावसाचा खेळ सुरू झाल्याचे दिसून येत आहे. कधी कडकडीत ऊन तर कधी धुवाधार पाऊस असेच वातावरण दिसून येत आहे. धरण पाणलोट क्षेत्रासह अन्य ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस कोसळत असल्याने, तेथील पाणवठे भरली आहेत. बहुतांश तलाव पूर्णतः भरल्याने ओसंडून वाहू लागले आहेत. त्यामुळे सुद्धा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होताना दिसत आहे.राधानगरी तालुक्यातील राधानगरी, काळम्मावाडी आणि तुळशी धरण क्षेत्रात पावसाची धुवाधार सुरुच आहे. गेल्या वीस दिवसात राधानगरी धरण क्षेत्रात 368 मि.मी.पावसाची नोंद झाली असून, सध्या धरणामध्ये 61 टक्के पाणीसाठा आहे. या धरणातून सध्या 3 हजार 100 क्युसेक विसर्ग सुरू आहे.काळमवाडी धरण क्षेत्रातही 597 मि.मी.पाऊस झाला आहे.हे धरण 30 टक्के भरले असून, 1 हजार 600 क्युसेक विसर्ग सुरू आहे .तर तुळशी धरण क्षेत्रात 410 मि.मी.पावसाची नोंद झाली असून, ते 55 टक्के भरले आहे.शिवाय वारणा धरण 55 टक्के भरले असून 1 हजार 640 क्युसेक विसर्ग सुरू आहे.तर घटप्रभा शंभर टक्के भरले असून, त्यातून 4 हजार 265 क्युसेक विसर्ग सुरू आहे. शिवाय कोदे ल.पा.99 टक्के भरले आहे.