
अटक केल्यानंतर आरोपीला दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात पोलिसांना अपयश आल्याची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने बांगलादेशी महिलेची सुटका केली आहे. न्यायालयात अटकेनंतर 24 तासांच्या आत आरोपीला हजर करणे अनिवार्य असतानाही पोलिसांना याची माहिती नसल्याबाबत न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांनी ताशेरे ओढले.
वाशी येथील शबनम अन्सारी या बांगलादेशी महिलेला पोलिसांनी 28 जानेवारी रोजी मुलासह अटक केली. 24 तास उलटून गेल्यानंतर तिला दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. याप्रकरणी शबनमने हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला. त्यावर न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. अटकेनंतर आरोपीला 24 तासांत हजर करणे कायद्याने अनिवार्य आहे. पोलिसांनी यात दिरंगाई केल्याने याचिकाकर्त्या महिलेच्या अधिकाराचे उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट करत हायकोर्टाने शबनम हिचा जामीन अर्ज मंजूर केला.