अक्षर सुधारा! उच्च न्यायालयाचा डॉक्टरांना डोस, नेमकं प्रकरण काय?

आजारी पडल्यानंतर आपण जवळच्या रुग्णालयात धाव घेतो. डॉक्टर रुग्णाला तपासून त्याला आवश्यक ती गोळ्या औषधे लिहून देतात. मात्र डॉक्टरांनी लिहिलेलं ते प्रिस्क्रिप्शन आपल्याला कळत नाही. तसेच मेडिकल शॉपमधील कर्मचाऱ्यालाही कधी कधी डॉक्टरांचे अक्षर ओळखणे कठीण जाते. त्यामुळे चुकीची औषधे देण्याचाही धोका असतो. यावरूनच आता हायकोर्टाने डॉक्टरांचे कान टोचले आहेत.

डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर आता पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने हायकोर्टाने टिप्पणी केली आहे. जोपर्यंत डिजिटल प्रिस्क्रिप्शन पद्धती लागू होत नाही तोपर्यंत डॉक्टरांनी मोठ्या, सुवाच्य अक्षरात प्रिस्क्रिप्शन लिहावेत असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. रुग्णांना योग्य आणि कळेल या भाषेत वैद्यकीय प्रिस्क्रिप्शन मिळविण्याचा अधिकार आहे. बलात्कार, फसवणूक आणि बनावटगिरी प्रकरणाशी संबंधित जामीन अर्जाच्या सुनावणीदरम्यान असे निर्देश देण्यात आला. न्यायमूर्ती जसबीरप्रीत सिंह पुरी यांना वैद्यकीय-कायदेशीर अहवालातील एकही शब्द वाचता आला नाही. त्यामुळे न्यायालयाने डॉक्टरांच्या हस्ताक्षराचा थेट संबंध रुग्णाच्या आयुष्याशी जोडला आहे.

डॉक्टरांचे हस्ताक्षर अनेकदा इतके खराब असते की लिहून दिलेले औषध कोणते आहे हेच समजत नाही. औषध विक्रेत्याकडून हे लिखाण वाचताना गडबड झाली तर चुकीचे औषध रुग्णाला दिले जाण्याची शक्यता असते. यातून रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. यामुळेच डॉक्टरांनी वाचता येईल अशा मोठ्या अक्षरात प्रिसिक्रिप्शन लिहून देणे आवश्यक आहे; असे न्यायमूर्ती जसबीरप्रीत सिंह पुरी यांनी म्हटले.

अशा घटनांमुळे वैद्यकीय अभ्यासक्रमात हस्तलेखन प्रशिक्षणही देणे गरजेचे आहे. त्यामुळे न्यायालयाने सरकारला आता अभ्यासक्रमात हस्तलेखन प्रशिक्षण समाविष्ट करण्याचे निर्देश दिले. तसेच दोन वर्षांत देशभरात डिजिटल प्रणाली लागू करण्याचे निर्देश दिले. तंत्रज्ञान आणि संगणक सहज उपलब्ध असतानाही सरकारी डॉक्टर अजूनही हाताने प्रिस्क्रिप्शन लिहितात हे आश्चर्यकारक आहे, असे न्यायमूर्ती पुरी म्हणाले.

इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) ने या आदेशाला प्रतिसाद दिला आहे आणि त्याच्याशी सहमती दर्शविली आहे. आयएमएचे अध्यक्ष डॉ. दिलीप भानुशाली म्हणाले, “आम्ही यावर उपाय शोधण्यास तयार आहोत. शहरी रुग्णालयांमध्ये डिजिटल प्रिस्क्रिप्शन आधीच सुरू झाले आहे. पण जी लहान शहरे किंवा ग्रामीण भाग आहेत तेथे डिजिटल सेवा चालू करणे जरा आव्हानात्मक आहे. सरकारी जवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या जास्त असते. त्यावेळी वेळे अभावी डॉक्टरांना प्रिस्क्रिप्शन घाईत लिहावे लागते. यामुळे त्यांचे अक्षर बिघडले, असे त्यांनी सांगितले.