पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची नकोच! डॉ.नरेंद्र जाधव यांनी मांडले वैयक्तिक मत

त्रिभाषा समितीचे मत काय आहे हे मला माहीत नाही. माझे वैयक्तिक मत असे आहे की,पहिली पासून हिंदी भाषेची सक्ती नको अशी स्पष्ट भूमिका त्रिभाषा समितीचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र जाधव यांनी आज रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत मांडली.
त्रिभाषा समिती जो अहवाल देणार आहे त्याकडे फक्त महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. कारण दक्षिणेकडच्या राज्यांनी आम्हाला तिसरी भाषा नकोच असे सांगितले आहे अशी माहिती डॉ.नरेंद्र जाधव यांनी दिली.

त्रिभाषा समितीची संवाद बैठक आज रत्नागिरीत पार पडली.त्याबैठकीनंतर त्रिभाषा समितीचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र जाधव यांनी सांगितले की, एका ठिकाणी बसून समितीचा अहवाल देण्यापेक्षा आपण महाराष्ट्रात फिरून मतं जाणून घेण्याचा आम्ही विचार केला. राज्यात आम्ही आठ ठिकाणी बैठका घेणार आहोत. महापूरामुळे छत्रपती संभाजीनगर येथील बैठक होऊ शकली नाही. त्यानंतर आम्ही नागपूरला बैठक घेतली आणि तिसरी बैठक आज रत्नागिरीत झाली. आज बैठकीत अनेक शिक्षक आणि नागरिकांनी पहिली पासून हिंदी भाषा सक्ती नको म्हणून सांगितले. काहींनी हिंदी भाषेचे मराठीवर आक्रमण होईल असे सांगितले आणि काहींनी हिंदी भाषा रत्नागिरी जिल्ह्यात लोप पावत असल्याचे सांगितले. काही मंडळींनी हिंदी भाषा सक्तीचे समर्थनही केल्याचे डॉ.नरेंद्र जाधव यांनी सांगितले.

डॉ.नरेंद्र जाधव यांनी सांगितले की, अनेक वेळा बोलीभाषेमुळे प्रमाण भाषा उच्चारताना ण चा न होतो किंवा ळ चा ल होतो त्यासाठी आम्ही भाषा प्रयोगशाळा सुरू करायचा विचार मांडत आहोत. हसतखेळत याप्रयोगशाळेत शब्दांचे उच्चारण होईल असे ते म्हणाले.