मतदानाचा अधिकार टिकवायचा असेल, तर मतभेद विसरून एकत्र यावं लागेल – शरद पवार

मतदानाचा अधिकार टिकवायचा असेल, तर मतभेद विसरून एकत्र यावं लागेल, असं आवाहन आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. मतचोरीविरोधात निघालेल्या ‘सत्याचा मोर्चा’ला ते संबोधित करत होते. यावेळी बोलताना त्यांनी हे आवाहन केलं आहे.

फॅशन स्ट्रीटपासून सुरू झालेल्या मोर्चामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शेकापचे जयंतभाई पाटील, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, शिवसेना खासदार अरविंद सावंत, खासदार संजय दिना पाटील, खासदार अनिल देसाई, माजी खासदार विनायक राऊत, आमदार सुनिल प्रभू, आमदार सचिन अहीर, माजी खासदार चंद्रकांत खैरे, सुषमा अंधारे, सतेज पाटील, जितेंद्र आव्हाड, वरुण सरदेसाई, बाळा नांदगावकर, अनिल देशमुख, सुनिल लंके, भाई जगताप, कृष्णा रेड्डी आणि लाखोंचा जनसमुदाय सहभागी झाला.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, “‘देशाची लोकशाही टिकवण्यासाठी कष्ट करायला तयार असलेले तुम्ही बंधू भगिनी. आजचा मोर्चा मला जुन्या गोष्टी आठवण करून देतो. मला आठवतंय १९७८-८९ या काळात महाविद्यालयात शिकत असताना संयुक्त महाराष्ट्रात असाच मोर्चा निघाला होता. काळा घोडा आणि त्याचा परिसर तिथे मोर्चे एक प्रकारचा विचार समन्वय दाखवणारे मोर्चे होते.”

ते म्हणाले, “तुम्ही सर्वांनी जी जबरदस्त एकजूट दाखवली. त्यातून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ होती, त्याची आठवण होते. आज महत्त्वाचा विषय आपण हातात घेतला. आपण स्वतसाठी काही मागत नाही. आपण एवढंच म्हणतोय की लोकशाहीत संविधानाने तुम्हा आम्हाला अधिकार दिला त्याची जतन करणं याची वेळ आली आहे.”

शरद पवार पुढे म्हणाले की, “आमचे पक्ष वेगळे आहेत. विचारधारा वेगळी आहे. कधी मतभेद असतात. पण देशातील संसदीय लोकशाही टिकवायची असेल आणि मतांचा अधिकार टिकवायचा असेल तर तुम्हाला मला एक व्हावे लागेल. व्यासपीठावरील नेत्यांच्या वतीने आम्ही हा निकाल घेतला. मतचोरी थांबवू आणि लोकशाही कशी टिकेल याची खबरदारी घेऊ. “