क्रिकेटनामा – भाऊबीजेची ओवाळणी घातली!

>> संजय कऱ्हाडे

भाऊबीजेच्या मुहूर्तावर रविवारी ऑस्ट्रेलियन भावांनी ओवाळलं अन् हिंदुस्थानी भावांनी त्यांच्या ओटीत ओवाळणी घातली! लखनौच्या नवाबासारखी आपली रविवारची खेळी झाली. आप जीतो ‘पहले आप, पहले आप’ अशी!

दणकेबाज सुरुवात आपल्याला करता आली नाही. पलंगाखाली घरंगळत गेलेलं दहा रुपयाचं नाणं शोधावं तसा आपला फॉर्म रोहितने शोधला. पण डोळे ताणून, कसरत करूनही त्याच्या हाती दहाऐवजी पाच रुपयांचंच नाणं आलं! कारण त्या नादात धावांची गती संथ झाली आणि त्यामुळे आलेल्या दडपणाचा बळी कप्तान शुभमन ठरला. रोहितला सूर सापडेपर्यंत धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात गिल बाद झाला. अखेर रोहितसुद्धा मोठी शतकी खेळी करू शकला नाहीच. अर्थात, रोहितची खेळी त्याला थोडं समाधान देऊन जाईल. पण या खेळीला कसं वर्णावं बुडत्याला काडीचा आधार म्हणावं की अंधारात दिसलेला आशेचा किरण म्हणावं!

विराट कोहलीला पुन्हा एकदा शून्यावर बाद होताना खूप वाईट वाटलं. दोन उसळणारे चेंडू ऑफ स्टम्पबाहेर. तिसरा सरळ ऑफ स्टम्पवर. चौथा ऑफ स्टम्पवर पडून आत, ‘को’ पायचीत! ‘को’ची हतबलता आता पाहवत नाही. त्याचं पदलालित्य पाहून आमच्या कानांनी पैंजण ऐकलेली आहे. तेच पाय आज खुंट्याला अडकलेले पाहणं जिवावर येतं. क्षेत्ररक्षण करतानाही तो अधिक काळ दोन्ही हात खिशात अन् मान खाली घालून उदास दिसतो. हातवारे नाहीत, आरडाओरडा नाही, वेगवेगे धावणं नाही, बेंबीच्या देठातून अपील नाही गेला बाजार, बेन स्टोक्सचीसुद्धा आठवण काढत नाही! विराटने ‘निर्णय’ घेतला असावा असं उगाचच वाटतंय. आजही तो अस्मानात आहे, त्याने तिथेच रहावं, एवढीच इच्छा!

रोहित-श्रेयसची शतकी भागीदारी बरी धावसंख्या उभारण्यासाठी उपयोगी ठरली. श्रेयससाठीसुद्धा हे अर्धशतक महत्त्वपूर्णच म्हणावं लागेल. शेवटी दोनशे चौसष्ट अशी बरी धावसंख्या आपण उभारली.

अरेच्या, आज बीज आहे हो ! ओवाळणी नको का? देतो की! सिराज अन् अक्षयने झेल सोडून तेच केलं. राणा महाराजांनी मग विडाच उचलला. चोवीस धावा केल्या होत्या. ‘गौ’ लंच टाइममध्ये हसला होता. चला साठ धावा देऊया, त्याला पुन्हा ‘गं’ करूया ! ‘राणाजी, माफ करना, गलती म्हारे से हो गई!’ ‘आगौं’ गायले असतील!

असो, वन डे मालिकेचं तर आता सूप वाजलंच आहे. तिसरा अन् शेवटचा सामना सिडनीला आहे. पाहूया, कोण-कोण, काय-काय ‘निर्णय’ घेतंय! एवढी ओवाळणी आमच्या पदरात टाकाच!