IPL 2026 – काही गोष्टी कधीच संपत नाहीत; दिल्ली कॅपिटल्समध्ये परतल्यानंतर पृथ्वी शॉ भावूक, म्हणाला…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पृथ्वी शॉ आयपीएलच्या १९ व्या हंगामासाठी पुन्हा एकदा आपल्या जुन्या संघात म्हणजेच ‘दिल्ली कॅपिटल्स’मध्ये परतला आहे. आगामी आयपीएल २०२६ चा थरार २८ मार्चपासून सुरू होत असून, पृथ्वी शॉ अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर दिल्लीच्या ताफ्यात सामील झाला आहे. मागील लिलावात अनसोल्ड राहिल्यानंतर, यंदा दिल्ली कॅपिटल्सने पृथ्वीवर विश्वास दाखवत त्याला ७५ लाख रुपयांच्या बोलीवर संघात स्थान दिले आहे. आपल्या लाडक्या खेळाडूचे स्वागत करताना दिल्ली कॅपिटल्सने सोशल मीडियावर ‘आमचा मुलगा घरी परतला आहे’ अशा आशयाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

पृथ्वी शॉ आणि दिल्ली कॅपिटल्सचे नाते सात वर्षांचे जुने आहे, मात्र आयपीएल २०२५ च्या लिलावापूर्वी त्याला संघातून मुक्त करण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या वर्षीच्या लिलावात एकाही संघाने पृथ्वीला खरेदी करण्यात रस दाखवला नव्हता, ज्यामुळे त्याला संपूर्ण हंगाम मैदानाबाहेर राहावे लागले होते. यंदाच्या आयपीएल २०२६ च्या लिलावातही सुरुवातीला त्याला प्रतिसाद मिळाला नाही, मात्र ‘एक्सीलरेटेड फेज’मध्ये दिल्लीने पुन्हा एकदा पृथ्वीला संधी देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे पृथ्वी शॉच्या आयपीएल कारकिर्दीला पुन्हा एकदा नवी उभारी मिळाली आहे.

IPL 2026 मध्ये अनलोल्ड राहिलेल्या खेळाडूची तोडफोड फलंदाजी, अवघ्या पाच धावांनी द्विशतक हुकलं

आपल्या घरवापसीवर भावना व्यक्त करताना पृथ्वी शॉ म्हणाला की, “कोटला सारख्या जागेला आणि तिथल्या वातावरणाला तुम्ही कधीच विसरू शकत नाही. या मैदानातील गर्दीचा आवाज असो किंवा शांतता, या जागेनेच मला घडवले आहे. काही कथा कधीच संपत नाहीत, त्या पुन्हा सुरू होतात. दिल्ली, तुमचा मुलगा घरी परतला आहे.” पृथ्वीच्या या प्रतिक्रियेमुळे दिल्लीचे चाहते सुखावले असून, यंदाच्या हंगामात तो आपल्या बॅटने कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.