जालिंदर सुपेकर यांच्याकडून कारागृह उपमहानिरीक्षकपदाचा चार्ज काढून घेतला!

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात चर्चेत असलेले येरवडा येथील मध्यवर्ती कारागृहाचे महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्याकडून कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला आहे. सुपेकर यांच्याकडून जबाबदारी काढून घेतल्यानंतर, नाशिक विभागाची जबाबदारी अधीक्षक अरुणा मुगटराव, नागपूर विभागाची जबाबदारी उपमहानिरीक्षक स्वाती साठे आणि छत्रपती संभाजीनगर विभागाची जबाबदारी अधीक्षक वैभव आगे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पोलीस महासंचालक जालिंदर सुपेकर यांचे नाव सातत्याने पुढे येताना दिसले. एवढेच नाही, तर वैष्णवीच्या वडिलांनी थेट सुपेकरांचे नाव घेतले, ज्यामुळे मोठी खळबळ उडाली. राजेंद्र हगवणे यांचे जालिंदर सुपेकर मेहुणे आहेत आणि सुपेकरांचा पोलिसांवर दबाव असल्याने हगवणे यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप होत होता. सततच्या आरोपांनंतर जालिंदर सुपेकर यांनी वैष्णवी हगवणे प्रकरणात आपला काहीच संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही सुपेकर यांच्यावर आरोप केला होता. त्यामुळे या प्रकरणात सुपेकर चांगलेच चर्चेत आले होते. त्यातच गुरुवारी जालिंदर सुपेकर यांच्याकडील तीन अतिरिक्त पदांचा कार्यभार काढून घेण्यात आला. त्यामुळे या प्रकरणात नाव आल्यानेच ही कारवाई झाल्याची चर्चा सुरू आहे.