अरे काय चालू आहे महाराष्ट्रात? एकनाथ शिंदेंची शिवरायांबरोबर तुलना केल्याने जितेंद्र आव्हाड संतापले

भाजप आणि मिंधे गटातील नेत्यांनी अलीकडच्या काळात महापुरुषांबद्दल अनेक बेताल वक्तव्य केली आहेत. परंतु आता पुन्हा एकदा मिंधे गटाच्या वतीने एकनाथ शिंदेंची शिवाजी महाराजांसोबत तुलना केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मिंधे गटाच्या वतीने एक बॅनर लावण्यात आलं आहे. या बॅनरवर ‘350 वर्षानंतर… पुन्हा तोच योग’ या आशयाच्या देखाव्यात एका बाजूला भवानी देवी छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार देताना दाखवण्यात आलं आहे. तर, दुसऱ्या बाजूला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे हे एकनाथ शिंदेंना धनुष्यबाण सुपूर्द करताना दाखवण्यात आलं आहे.

यावर जितेंद्र आव्हाडांनी ट्वीट करत ‘अरे काय चालू आहे महाराष्ट्रात,’ असा संतप्त सवाल विचारला आहे. जितेंद्र आव्हाड ट्विटमध्ये म्हणाले की, “तुलना तर सोडाच… थेट छत्रपती शिवाजी महाराजच… अरे काय चालू आहे, महाराष्ट्रात. विद्रुपीकरण एका ऐतिहासिक घटनेचं. ते पण इतकं,”

मनसचे आमदार राजू पाटील यांनीही या बॅनरवरून टीका केली आहे. “कोणी स्वतःलाच ‘जाणता राजा’ म्हणवतं, तर कोणी ही अशी चित्रं काढून घेतं. अशा उपमांनी किंवा तुलनांनी कुणालाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नखाचीही सर येणार नाही. राजकीय स्वार्थासाठी शिवाजी महाराजांची तुलना करताना जनाची नाही, तर मनाची तरी चाड ठेवा. शिवप्रभू एकमेव होते, आहेत आणि राहतील. अतीउत्साही कार्यकर्त्यांना आवरा,” अशी टीका आमदार राजू पाटील यांनी केली.