Latur News – विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची तात्काळ पूर्तता करावी; लातूरमध्ये शिवसेनेचा रास्ता रोको

शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आणि सन्मान योजनेतून 15 हजार रुपये, लाडक्या बहिणींना 1500 चे 2100 रुपये, 45 हजार गावात पाणंद रस्ते, वृद्ध पेन्शन धारकांना 2100 रुपये, शेतीला 24 तास वीज आणि बेरोजगारांना 25 लाख नोकऱ्या आणि 10 हजार विद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनांचे काय झाले? असा सवाल करीत सरकारने या सर्व आश्वासनांची तात्काळ पूर्तता करावी, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गुरुवारी लातूरच्या छत्रपती चौकात रास्ता रोको आंदोलन केले.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा व महायुतीने अनेक घोषणा केल्या होत्या. या घोषणांची अंमलबजावणी करावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राज्यभर आंदोलने सुरू आहेत. लातूर येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोषभाऊ सोमवंशी, बालाजी रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना हे निवेदनही दिले होते. त्यानंतर सत्ताधारी स्थानिक आमदारांना या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावरही सरकारने लक्ष न दिल्याने अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गुरुवारी औसा रोड वरील छत्रपती चौकात रास्ता रोको आंदोलन केले.

जवळपास तासभर चाललेल्या या आंदोलनामुळे रत्नागिरी नागपूर महामार्गावरील वाहतूक तसेच लातूरच्या बायपासवरील वाहतूक ठप्प झाली. यावेळी शिवसैनिकांनी महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी तात्काळ द्या, यासह अनेक घोषणा यावेळी देण्यात आल्या.