महाराष्ट्रासह 4 राज्यांत कमी वजनाची बाळे

देशातील 47 टक्के कमी वजनाची बाळे उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल आणि महाराष्ट्रात जन्मतात. 1993 पासून कमी वजनाच्या बाळांची संख्या 26 टक्क्यांवरून 18 टक्के इतकी घटली आहे. ब्रिटिश मेडिकल जर्नलच्या ग्लोबल हेल्थ अहवालातून ही आकडेवारी समोर आली आहे. अमेरिकेतील डयुक आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटी आणि दक्षिण कोरियाच्या संस्थांमधील अभ्यासकांनी राष्ट्रीय परिवार स्वास्थ्य सर्वेक्षण (एनएफएचएस) मधील आकडय़ांचे सखोल विश्लेषण करून ही माहिती सादर केली. ज्या बाळांचे जन्मतःच वजन पाच पौंडांपेक्षा कमी म्हणजे अडीच किलोपेक्षा कमी आहे, त्यांना कमी वजनाची बाळे म्हणतात. अकाली जन्म आणि गर्भाशयात वाढ न होणे ही बाळांच्या कमी वजनाची कारणे आहेत.