
राज्यभरात मागील काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असून, नागरिकांना असह्य उष्णतेचा सामना करावा लागत आहे. वाढत्या तापमानाची गंभीर दखल घेत हवामान विभागाने आता मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी उष्णतेचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. विशेष म्हणजे, या मोसमातील हा पहिलाच ऑरेंज अलर्ट असल्याने प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सध्याची स्थिती पाहता सूर्य अक्षरशः आग ओतत असल्याचे चित्र असून कडाक्याच्या उन्हामुळे सर्वसामान्यांच्या अंगाची लाही लाही होत आहे. घामाच्या धारा आणि उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईत सरासरी कमाल तापमानापेक्षा 6 अंश सेल्सिअस जास्त, तर डहाणूत सरासरीपेक्षा तब्बल 8 अंश सेल्सिअस जास्त तापमानाची नोंद झाली आहे. आज तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने स्पष्ट केले आहे की, आगामी 48 तास अत्यंत धोक्याचे असून नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अतिशय महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. वाढत्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी दुपारी घराबाहेर पडणे टाळावे.























































