
तब्बल दोन वर्षे रस्ते रक्तपाताने माखल्यानंतर एन बीरेन सिंह यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर हिंसक आंदोलने वाढल्याने राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. तरीही मणिपुरातील रक्तरंजित संघर्ष सुरूच असून येथेही भाजपने राजकारण सुरू केल्याचे समोर आले आहे. एनडीएचे 44 आमदार नवे सरकार स्थापन करण्याच्या तयारीत असल्याचा दावा भाजप आमदार थोकचोम राध्येश्याम सिंह यांनी आज राजभवन येथे राज्यपालांचे भेट घेऊन केला.
नवीन सरकार अपयशी ठरले तर पुन्हा पूर्ण ताकदीने राष्ट्रपती राजवट लागू करता येईल असे भाजप आमदार थोकचोम राध्येश्याम सिंह यांनी राजभवन येथून बाहेर आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. राज्यातील सध्याच्या घडामोडी आणि जनतेकडून वाढता दबाव पाहता लोकाभिमुख सरकार स्थापन करण्याची हीच वेळ आहे. राष्ट्रपती राजवट ही आणीबाणीची उपाययोजना असते, असेही ते म्हणाले. सरकार स्थापन व्हावे ही मणिपूरच्या जनतेची इच्छा असून राज्यपालांनी आमचे म्हणणे ऐकून घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, सत्ता स्थापनेचा दावा करणाऱया आमदारांपैकी 9 आमदार हे मैतेईबहुल खोऱयातील आहेत. तर पनमेई हे नागा समुदायाचे आमदार आहेत.
असे आहे संख्याबळ
विधानसभेची सदस्य संख्या 60 असून सध्या 59 आमदार आहेत. एका आमदाराच्या निधनाने एक जागा रिक्त आहे. भाजपाकडे 32 मैतेई, तीन मणिपुरी मुस्लिम, 9 नागा असे एकूण 44 आमदारांचे संख्याबळ आहे. तर काँग्रेसकडे पाच आमदार असून ते सर्वच्या सर्व मैतेई आहेत. उर्वरित 10 आमदार हे कुकी समाजाचे आहेत. त्यातील 7 आमदार हे भाजपाच्या तिकिटावर निवडणूक जिंकले होते. तर दोन आमदार कुकी समाजाच्या आघाडीचे आहेत. तर एक आमदार अपक्ष आहे.