आता आरपारची लढाई, 29 ऑगस्टला मुंबईत धडकणार; मनोज जरांगे यांची घोषणा

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहे. आता आगामी आंदोलन मुंबईतच होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हे आंदोलन निर्णायक ठरणार असून मराठा समाजाच्या विजयाचा गुलाल उधळायचाच आहे, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. मुंबईतील हे आंदोलन आता फक्त मागणीचं नाही, तर निर्णय घेण्यासाठीचं असेल, असे देखील त्यांनी म्हटले आहे. आपल्याला 29 ऑगस्टला मुंबईत धडकायचे आहे, त्यासाठी 27 ऑगस्ट रोजी अंतरवालीतून निघायचे आहे, अशी घोषणाही त्यांनी केली.

जालन्यातील अंतरवाली सराटी येथे रविवारी मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यव्यापी बैठक बोलावली होती. मराठा आरक्षणासह गेली दोन वर्षे मराठा समाजाला आंदोलन करून काय मिळालं? आणि आता काय मिळवायचं? याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच 29 ऑगस्टच्या मुंबई आंदोलनाच्या नियोजनाबाबतबाबतही बैठकीत चर्चा झाली.

या बैठकीनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. 29 ऑगस्टला मुंबईला जायचं आहे. 27 ऑगस्ट रोजी अंतरवालीतून निघायचे आहे. कुठेही न थांबता 28 ऑगस्टला रात्री मुंबईत पोहचायचे आहे. मुंबईतील सर्वच लोकांनी मागे आपली सेवा केली, त्यात परप्रांतीय लोकांनी सुद्धा आपली सेवा केली आहे. पावसाचे दिवस असून मला तुम्ही मुंबईत सोडायला या, पुढचं मी पाहतो. आता अशी संधी पुन्हा मिळणार नसून विजयाची चाहूल लागली आहे, असे त्यांनी म्हटले.

आता आपल्याला रणभूमीत उतरायचं आहे आणि विजयही मिळवायचा आहे. रणभूमीची तयारी अशी असली पाहिजे की, यावेळी यश आपलंच असणार, असे ते म्हणाले. आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही. मैदान आपणच गाजवायचं असून, विजयाचा गुलालही उधळला जाणार आहे. मागील दोन वर्षांपासून मराठा समाजासाठी आंदोलन सुरू असून, आता ही लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. ही शेवटची लढाई मराठ्यांनी जिद्दीने आणि एकजुटीने पार पाडली पाहिजे, असे ते म्हणाले.