नाटे येथील व्यापारी संकुलाला भीषण आग; सात दुकाने जळून खाक

राजापूर तालुक्यातील नाटे बाजारपेठेतील व्यापारी संकुलाला शनिवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत सात दुकाने जळून खाक झाली आहेत. व्यापाऱ्यांचे सुमारे 60 लाख रूपयांहून अधिक नुकसान झाले आहे. नाटे येथील राजेश दत्ताराम पावसकर यांच्या मालकीच्या इमारतीला काल रात्री काल रात्री 12.30 वाजता अचानक आग लागली. काही क्षणात आगीने रौद्ररुप धारण केले. आग विझविण्यासाठी ग्रामस्थांनी आटोकाट प्रयत्न केले. त्यानंतर, राजापूर नगर पालिकेचा अग्नीशमन बंबही घटनास्थळी दाखल झाला. सुमारे पाच तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. मात्र, तोपर्यंत सात दुकानातील साहित्य जळून खाक झाले होते. या इमारतीमध्ये कोणीही रहिवासी नसल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.

आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी, शॉर्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. या आगीमध्ये झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये व्यवसायिकांचे सुमारे साठ लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये दिगंबर गिजम यांच्या उपहारगृहातील संपूर्ण फर्निचर, किचन यंत्रणा आणि साहित्य जळून नुकसान झाले आहे. तर, भीम खंडी यांचे चायनीज फास्ट फूड सेंटर जळून, प्रदीप मयेकर यांच्या टेलरिंग शॉपमधील मशीन्स, तयार कपडे, केदार ठाकूर यांचे कापड व प्लास्टिक वस्तू विक्री दुकान, प्रसाद पाखरे यांच्या फोटो स्टुडिओ आगीच्या भक्षस्थानी पडून कॅमेरे, प्रिंटिंग उपकरणे, संगणक, निकिता गोसावी यांचे ब्युटी पार्लर, नारायण गोसावी यांचे कटलरी साहित्यांचे गोडाऊन जळून खाक झाले आहे.