श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या दर्शन रांगेतील घुसखोरी बंद, मंदिर प्रशासनाने बसवल्या तारेच्या जाळ्या

आषाढी यात्रेला भाविकांची संख्या लाखोंच्या पटीत वाढणार आहे. यात्रेला आलेले भाविक हे श्री विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन घेण्यास उत्सुक असतात. त्यामुळे हे भाविक दर्शन रांगेत तासनतास उभे राहतात. दर्शन रांगेत थांबूनच श्री विठ्ठलाचे दर्शन घेतात. मात्र, दर्शन रांगेत घुसखोरी होऊ नये, रांगेत थांबलेल्या भाविकांना दर्शनासाठी विलंब होऊ नये,म्हणून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने दर्शन रांगेला तारेची जाळी बसवली आहे. यामुळे आता कुणालाही अधुनमधुन घुसखोरी करता येणार नाही.

श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांनी संख्या दिवसेदिवस वाढत आहे. यातच आता भाविकांना आषाढी यात्रेचे वेध लागले आहेत. आषाढी यात्रा सुरक्षित रित्या पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनासह श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती देखील विविध उपाय योजना राबवू लागली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व सदस्य यांनी निर्णय घेत दर्शन रांगेत होणारी घुसखोरी रोखण्यासाठी तारेची जाळी बसवण्यात आली आहे. यामुळे भाविकांना दर्शन रांगेत घुसखोरी करता येणार नाही. यामुळे दर्शन रांगेत घडणाऱ्या वादविवादांना आपोआप आळा बसणार आहे. तारेची जाळी बसविण्यात आल्याने सर्वसामान्य भाविकांचे विशेषत: महिला भाविकांचे पर्स, मोबाईल अशा चोरीच्या घटनांही आळा बसण्यास मदत होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, दर्शन रांगेत चार ते पाच किमी पर्यंत तारेची जाळी बसविण्यात येत आहे. त्यामुळे घुसखोरी टळली जाणार आहे. तसेच अनुचित प्रकार घडू नये, म्हणून ठरावीक अंतरावर भाविकांना दर्शन रांगेत प्रवेश देण्यासाठी गेट ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे या गेटमधून आपतकालीन प्रसंगी दर्शन रांगेतील भाविकांना तारेच्या जाळीमधून बाहेर काढता येणे शक्य आहे.