
कपडे धुण्यासाठी गोदावरीच्या पात्रात उतरलेली आई बुडत असल्याचे पाहून काठावर उभ्या असलेल्या दोन्ही मुलींनी पाण्यात उडी मारली. परंतु कुणालाही पोहता येत नसल्याने तिघींचाही बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नांदेड जिल्ह्यातील भायेगाव येथे शनिवारी घडली.
शनिवारी दुपारी गोदावरी नदीवर महानंदा भगवान हनुमंते (35), पायल भगवान हनुमंते (12) आणि ऐश्वर्या मालू हनुमंते (14) या तिघी मायलेकी कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. महानंदा या कपडे धुण्यासाठी पात्रात उतरल्या. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने त्या बुडाल्या. आईचा आरडाओरडा ऐकून काठावर उभ्या असलेल्या पायलने नदीपात्रात उडी मारली. तिच्या पाठोपाठ ऐश्वर्यानेही पाण्यात उडी घेतली. तिघींनाही पोहता येत नसल्याने एकमेकींचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात तिघीही बुडाल्या. एकाच कुटुंबातील तिघींचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.