दहा दिवस मान्सून सुट्टीवर, मुंबईचे तापमान वाढणार; घामाच्या ‘धारा’ वाहणार

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे प्रचंड वेगाने सक्रिय झालेल्या मान्सूनचा महाराष्ट्रातील वेग मंदावला आहे. हवामानात मोठा बदल झाला असून मान्सून पुढचे दहा दिवस अर्थात 10 जूनपर्यंत सुट्टीवर असणार आहे. याकाळात मुंबईसह संपूर्ण राज्याच्या तापमानात मोठी वाढ होईल आणि नागरिकांच्या अंगातून घामाच्या धारा वाहतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मान्सूनने यंदा 107 वर्षांचा विक्रम मोडीत काढून मे महिन्यातच महाराष्ट्रात ‘एंट्री’ केली. त्यानंतर पुढचे दोन-तीन दिवस राज्याच्या बहुतांश भागाला पावसाने झोडपले. विशेषतः कोकण किनारपट्टी भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडला. याचदरम्यान अरबी समुद्रात ‘शक्ती’ चक्रीवादळ तयार होण्याची भीती निर्माण झाली होती. सुदैवाने त्या चक्रीवादळाचा धोका टळला आणि लागोपाठ मान्सूनही थंड पडला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने रविवारी नव्या सूचना जारी केल्या. पुढचे दहा दिवस हवामानात मोठा बदल दिसून येईल. या काळात मान्सून गायब असेल. मुंबईवर अधूनमधून ढगाळ वातावरण राहील, मात्र 10 जूनपर्यंत पावसाच्या हजेरीची शक्यता फार कमी असेल. पश्चिम किनारपट्टी आणि राज्याच्या काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, असे हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे.

विदर्भाचा पारा पुन्हा चाळिशीवर जाणार

मान्सूनचा वेग मंदावल्याने उकाड्यात प्रचंड वाढ होण्याची चिन्हे आहेत. विदर्भाचे दिवसाचे तापमान पुन्हा 40 अंशांवर झेपावण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील आठवडाभर मुंबईचे कमाल तापमान 34 ते 35 अंशांच्या आसपास राहील. तसेच किमान तापमान 25 ते 26 अंशांवर राहणार आहे. या तापमानवाढीमुळे मुंबईकरांना जूनमध्ये मे महिन्याच्या उकाड्याचा अनुभव घ्यावा लागणार आहे.

पेरण्यांची घाई करू नका!

मान्सूनने दडी मारल्याने त्याचा शेतीवर मोठा परिणाम होणार आहे. याबाबत हवामान खाते व इतर सरकारी यंत्रणांनी शेतकऱ्यांना सावध केले आहे. राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होईपर्यंत पेरणीची घाई करू नका, असे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.