क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे दोषी! दोन वर्षांची शिक्षा कायम! अटक होणार!! सदनिका घोटाळय़ाप्रकरणी न्यायालयाचा मोठा निकाल

शासकीय कोटय़ातील सदनिका घोटाळाप्रकरणी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने आज मोठा निकाल देत राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवले असून, प्रथम वर्ग न्यायालयाने ठोठावलेली दोन वर्षे कारावासाची शिक्षा कायम ठेवली आहे. या शिक्षेची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश न्या. पी. एम. बदर यांनी दिले असून कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. या निकालाने कोकाटे यांचे मंत्रिपद आणि आमदारकीही धोक्यात आली असून, फडणवीस सरकार आणि अजितदादा गटासाठी हा मोठा हादरा आहे.

नाशिक शहरातील पॅनडा कॉर्नर या उच्चभ्रू भागात 1995 ते 1997 दरम्यान माणिकराव कोकाटे, त्यांचे बंधू विजय यांनी शासनाच्या दहा टक्के कोटय़ातील सदनिका अल्प उत्पन्न गटातून घेतल्या होत्या. यावर आक्षेप घेत माजी मंत्री स्वर्गीय तुकाराम दिघोळे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कन्या अॅड. अंजली दिघोळे राठोड या प्रकरणात तक्रारदार आहेत. अल्प उत्पन्न असल्याचे आणि दुसरे घर नसल्याच्या खोटय़ा माहितीची कागदपत्रे दिल्याचे समोर आले. 20 फेब्रुवारी 2025 रोजी नाशिकच्या प्रथम वर्ग न्यायालयाने या घोटाळ्याप्रकरणी माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय यांना प्रत्येकी दोन वर्षांची शिक्षा व पन्नास हजारांचा दंड ठोठावला होता. जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली आणि दंडाची रक्कम दहा हजार रुपये केली. यामुळे कोकाटे यांचे मंत्रीपद व आमदारकी धोक्यात आली आहे.

उच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी

जिल्हा न्यायालयाची शिक्षा कायम ठेवावी, यासाठी अॅड. अंजली दिघोळे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर शुक्रवारी, 19 डिसेंबर रोजी सुनावणी आहे, अशी माहिती अॅड. आशुतोष राठोड यांनी दिली.

राजीनाम्यासाठी राज्यपालांना पत्र देणार

कोकाटे हे गुन्हेगार असून त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी करणारे पत्र उद्या राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना देणार आहे, असे अॅड. आशुतोष राठोड यांनी सांगितले.

प्रकरण काय?

मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार योजनेच्या दहा टक्के राखीव कोटय़ातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या दोन सदनिका हडपल्याचा कोकाटे बंधूंवर आरोप आहे. नाशिक शहरातील पॅनडा कॉर्नरसारख्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या अपार्टमेंटमध्ये या सदनिका आहेत. बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक करून या सदनिका हडपल्याची माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांची मूळ तक्रार होती. त्यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी अॅड. अंजली दिघोळे राठोड यांनी हे प्रकरण लावून धरले.