
नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख जाहीर झाल्यानंतरही लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्याबाबत कोणतीही घोषणा सरकारने केली नाही. त्यामुळे संतप्त भूमिपुत्रांनी येत्या सोमवारी आंदोलन छेडण्याचा इशारा दिल्यानंतर सरकारची पळापळ झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही वेळ मिळाला आहे. नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाबाबत उद्या दुपारी मुख्यमंत्री बैठक घेणार आहेत.
या बैठकीला कृती समितीचे सर्व सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बाळ्यामामा म्हात्रे हे उपस्थित राहणार आहेत. नवी मुंबई विमानतळाला दिबांचे नाव देण्यासाठी सरकार टाळाटाळ करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आगरी-कोळी समाजाने बुधवारी आंदोलनाचा इशारा दिला होता.




























































