
येथील आंबोलीमध्ये पावसाळी पर्यटनासाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. आंबोलीतील मुख्य धबधब्यावर सायंकाळी 5 नंतर पर्यटकांना प्रवेशबंदी असून येथील खाद्यपदार्थ आणि इतर वस्तूंचे स्टॉल्सदेखील सायंकाळनंतर बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
याबाबत सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामपंचायत बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत मद्यपान करून धिंगाणा घालणाऱ्या पर्यटकांच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त करण्यात आली. अशा पर्यटकांमुळे कुटुंब आणि शांतताप्रिय पर्यटकांना त्रास होतो आणि त्यांना निसर्गाचा आनंद घेता येत नाही. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे, असे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सांगितले.
सुरक्षिततेसाठी हेल्मेट सक्ती
आंबोली, गेळे आणि चौकुळ या भागांमध्ये हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. पावसाळ्यामध्ये या भागात पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेसाठी हे नियम आवश्यक आहेत, असे मत पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी व्यक्त केले.