
इंदूरचे नवविवाहित जोडपे राजा-सोनम प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एक जोडपं बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील एक नवविवाहित जोडपं सिक्कीमला हनिमूनला गेलं ते परतलंच नाही. कौशलेंद्र सिंह आणि अंकिता सिंह अशी या जोडप्याची नावे आहेत. कौशलेंद्र आणि अंकिता 24 मे रोजी सिक्कीमला हनिमूनला गेले. त्यानंतर 29 मे रोजी त्यांच्या वाहनाचा अपघात झाला आणि तेव्हापासून ते बेपत्ता आहेत.
कौशलेंद्र आणि अंकिता उत्तर प्रदेशातील प्रतापगढ जिल्ह्यातील रहाटीकर गावातील रहिवासी असून 5 मे रोजी त्यांचा विवाह झाला. नवविवाहित जोडपं 24 मे रोजी सिक्कीमला हनिमूनसाठी गेले. त्यानंतर 29 मे रोजी संध्याकाळी ते प्रवास करत असलेली ट्रॅव्हलर व्हॅन मगन जिल्ह्यात 1000 फूट दरीत कोसळली. अपघातात व्हॅनमधील एकाचा मृत्यू झाला आणि दोन जण जखमी झाले. तर नवविवाहित जोडप्यासह अन्य आठ जण नदीत वाहून गेले.
अपघातानंतर एनडीआरएफकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. मात्र आठ दिवस उलटले तरी अद्याप कौशलेंद्र आणि अंकिताचा शोध लागला नाही. कौशलेंद्रचे कुटुंब त्यांचा शोध घेण्यासाठी सिक्कीमला दाखल झाले. सर्च ऑपरेशन वेगाने सुरू करावं, असं आवाहन सिंह कुटुंबीयांनी उत्तर प्रदेश आणि सिक्कीमला सरकारला केलं आहे.