गमावलेल्या पायांना खेळानेच बळ दिले

 रेल्वे अपघातात पाय गमावल्यानंतर मी निराश झालो होतो. वाटलं सारं काही संपलं. अनेक महिने मी बिछान्यावर खिळून पडलो होतो. जगण्याची इच्छाच उरली नव्हती. आधी फुटबॉलपटू बनायचे होते, पण अपघाताने ती इच्छा आपोआपच मरण पावली होती. पाय गमावल्यामुळे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आयआयटी मंडीत प्रवेश घेतला आणि तेथे माझ्या पायांना खेळाने बळ दिले. तिथेच प्रथमच जाणवलं की आपण बॅडमिंटन खेळू शकतो. आधी फुटबॉलवर लक्ष होते, अपघात झाला नसता तर मी नक्कीच फुटबॉलपटू झालो असतो, असे नितेश कुमार सुवर्ण विजयानंतर म्हणाला.

नितेश पुढे म्हणाला, माझे बाबा नौदलात अधिकारी असल्यामुळे मलाही त्यांचा गणवेष परिधान करायची इच्छा होती. मी जेव्हाही बाबांना पाहायचो तेव्हा मला खेळात किंवा नौदलात सेवा करण्याची मनापासून इच्छा होती. पण अपघाताने माझ्या स्वप्नांची राखरांगोळी केली. मात्र पुण्यात कृत्रिम पाय लावल्यानंतर माझा दृष्टिकोणच बदलला आणि माझी पावले बॅडमिंटनकडे वळली.

भगत आणि कोहलीकडून प्रेरणा
मी आज जो काही आहे त्याचे सारे श्रेय माझा सहकारी खेळाडू प्रमोद भगत याला जात असल्याचे नितेशने अभिमानाने सांगितले. तोच माझा खरा प्रेरणास्रोत आहे. त्यानेच मला एक चांगला खेळाडू म्हणून घडवले नाही तर एक चांगला माणूस म्हणूनही उभे केले. तसेच विराट कोहलीचा फिटनेस पाहून मी स्वतःत परिवर्तन केले. त्याच्यामुळे मी फिट आणि शिस्तबद्ध खेळाडू होऊ शकलो. या दोघांच्या प्रेरणेमुळेच मी आज एक खेळाडू म्हणून तुमच्यासमोर उभा राहू शकलोय.