
>> छायाचित्र: भूषण पाटील, नाशिक
भक्तांवर अपार माया करणार्या सावळ्या परब्रह्माचे दर्शन म्हणजे त्रिभुवनातील सर्वोच्च आनंद… ही आषाढातील आनंदवारी अनुभवण्यासाठी शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार त्र्यंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीसह दिंडी मंगळवारी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. टाळ-मृदंगाचा गजर, विठूमाऊलीचा जयघोष करीत निघालेल्या हजारो वारकर्यांच्या पावलांनी वेग घेतला आहे. त्र्यंबकेश्वरची वेस ओलांडून महानिर्वाणी आखाड्यात दिंडीचा पहिला मुक्काम होता. एकूण 27 दिवसांत 453 किलोमीटर प्रवास करून हा भक्तिसागर आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला 5 जुलै रोजी पंढरपुरी पोहोचणार आहे.
श्री निवृत्तीनाथ महाराज संजीवन समाधी मंदिर येथे शेकडो वर्षांच्या परंपरेप्रमाणे आषाढी वारीची संपूर्ण तयारी करण्यात आली होती. दोन दिवसांपासून जिल्ह्यातून सुमारे 56 दिंड्या दाखल झाल्याने मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. फुलांनी सजवलेली पालखी, चांदीचा रथ लक्ष वेधून घेत होता. मंदिरात दुपारी दिंडीप्रमुखांचा सन्मान करण्यात आला. संजीवन समाधीसमोर प्रस्थानाआधीचे भजन झाले. त्यानंतर नाथांची पालखी ठेवलेला रथ मार्गस्थ झाला. संस्थानचे अध्यक्ष सोमनाथ घोटेकर, पालखी सोहळा प्रमुख नवनाथ महाराज गांगुर्डे, विश्वस्त अमर ठोंबरे, जयंत महाराज गोसावी, नारायण मुठाळ, योगेश महाराज गोसावी, कांचन जगताप, नीलेश गाढवे आदींसह हजारो वारकरी टाळ-मृदंगाचा गजर करीत, संत-विठूनामाचा जयघोष करीत या वारीत सहभागी झाले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, रामकृष्ण महाराज लहवितकर, दिनकर पाटील आदींनी नाथांच्या पालखीचे दर्शन घेतले. तुळस डोक्यावर घेवून महिला वारकरी दिंडीत अग्रभागी होत्या. प्रथम तिर्थराज कुशावर्त येथे नाथांच्या पादुकांची पूजा व अभिषेक करण्यात आला. त्यानंतर निवृत्तीनाथ भगवान त्र्यंबकराजाच्या भेटीसाठी पोहोचले. कळसाचे दर्शन घेवून अभंग गायनानंतर पुढचा प्रवास सुरू झाला. मोठ्या संख्येने भाविकांनी दुतर्फा उपस्थित राहून पालखीवर पुष्पवृष्टी केली, नाथांचे दर्शन घेतले. यानंतर या भक्तिसागराने त्र्यंबकेश्वरची वेस ओलांडली. पहिला मुक्काम गुरूगृही म्हणजे पेगलवाडी येथील महानिर्वाणी आखाड्यात श्री गहिनीनाथ महाराज यांच्या समाधीस्थळी करण्यात आला. उद्या सकाळी दिंडी नाशिकच्या सातपूरकडे मार्गस्थ होईल. वाढोली फाटा येथे काही वेळ विसावा घेवून दुपारी महिरावणीत भोजन होईल. त्यानंतर पिंपळगाव बहुला येथे थोडा वेळ विश्रांतीसाठी थांबून दिंडी सातपूरला मुक्कामाच्या पालखीतळावर पोहोचेल.
या दिंडीसोबत पालखीची संपूर्ण व्यवस्था पाहण्यासाठी संस्थानने पूर्णवेळ सेवक अर्थात भोई नेमले आहेत. पिण्याच्या पाण्याचे 15 टँकर, 6 वैद्यकीय पथक आणि ग्रामीण पोलिसांचा बंदोबस्तही सोबत आहे.